आमदाराच्या बालेकिल्ल्यात खासदारांची इंट्री ; मांजरम सेवा सोसायटीवर खा.चिखलीकरांच्या समर्थकांचे प्रशासकीय मंडळ
New Bharat Times नेटवर्क
नायगाव : तालुक्यातील मांजरम सेवा सहकारी सोसायटीवर पाच सदस्यांचे प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले असून. खा.प्रताप पाटील चिखलीकरांनी आपल्या समसर्थकांची वर्णी लावून आमदार राजेश पवार यांच्या एक कलमी कारभाराला शह दिला असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार राजेश पवार यांच्या सौभाग्यवती सौ.पुनम पवार या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता. तेव्हा पासून आमदार व जिल्हा परिषद सदस्य आपला दबदबा ठेवून होते. पण कुठल्याही कार्यक्रमाला जिल्ह्यातील एकाही भाजपच्या नेत्यांना स्थान नव्हते. केवळ श्री व सौ या दोघांचाच कारभार होता.
सुरुवातीला मतदारांना बरे वाटले पण नंतर नंतर मात्र आ.पवार यांचा हा एक कलमी कार्यक्रम हा हेकेखोर पणाचा वाटू लागला. त्यामुळे त्यांच्यापासून कार्यकर्तेही दुरावू लागले. मात्र खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निमित्ताने दुरावलेल्या कार्यकर्त्यांना सक्षम पर्याय मिळाल्यापासून आ.पवारांच्या एक कलमी कार्यक्रमाला शह बसण्यास सुरुवात झाली.
भाजपच्या खासदार आणि आमदारात अनेक मुद्यावरुन बिनसले असल्याने नायगाव तालुक्यातील भाजपाचा जुना गट खा. चिखलीकर यांच्या बाजूने झुकला आहे. त्यामुळे हा गट आ. पवार यांच्या एक कलमी कारभाराला शह देण्याचा जोरदार प्रयत्न करत असतो. असाच एक प्रयत्न मांजरम सेवा सहकारी सोसायटीवर खा. समर्थकांची वर्णी लावून यशस्वी करण्यात आला आहे.
मांजरम सेवा सहकारी सोसायटीची मुदत संपल्याने अध्यक्ष म्हणून गोविंदराव गणपतराव शिंदे, उपाध्यक्ष ओम श्रीपतराव गायकवाड, संचालक बाबाराव जयवंतराव शिंदे, व्यंकटराव संभाजी केते, रामराव राजाराम मलदोडे यांची नियुक्ती एका पत्राद्वारे करण्यात आली. खा.प्रताप पाटील यांच्या समर्थकांची प्रशासकीय मंडळावर नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा तर विषय झालाच पण आमदार राजेश पवार यांच्या होम पिचवर खा.चिखलीकरांनी गुगली टाकत एककलमी कार्यक्रमाला शह दिला असल्याचे बोलल्या जात आहे. नवनियुक्त प्रशासकीय मंडळाला खा. चिखलीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
खा.चिखलीकर आ.पवार यांच्यात विस्तव जात नसल्याने दोघेही संधी मिळेल तेव्हा शह काटशहाचे राजकारण करतातच पण ऐन दिवाळीत खासदारांनी मांजरम सोसायटीवर आपल्या समर्थकांची वर्णी लावून फटाके फोडले आहेत. मात्र या फटाक्याची धग कुणा कुणाला जाणवणार आहे हे काही दिवसातच कळेल.