बेंद्री ग्रामस्थांची महावितरण कार्यालयात धडक; २४ तास अखंड वीजपुरवठ्याची मागणी, आठ दिवसांत तोडगा काढण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

दीपक गजभारे
नायगाव:- मौजे बेंद्री येथील ग्रामस्थांनी आज मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात धडक देत गावातील वारंवार होणारी वीज कपात, विशेषतः रात्रीच्या लोडशेडिंगबाबत तीव्र संताप व्यक्त केला. अनेक दिवसांपासून गावात नियमित वीजपुरवठा होत नसल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत असून, दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यावेळी ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी पाटील साहेब व तेलंग साहेब यांची भेट घेऊन, “बेंद्री गावातील रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करून गावाला २४ तास अखंड वीजपुरवठा द्यावा,” अशी ठाम मागणी केली.
गावात सातत्याने वीज नसल्यामुळे नागरिकांना मोबाईल चार्ज करण्यासाठी शेजारच्या गावात जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होत असून, शेतकरी, व्यापारी तसेच लहान व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे. सध्या सुरू असलेल्या उकाड्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री वीज नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे नागरिकांचा संयम संपत आला असून, प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत पाटील साहेब व तेलंग साहेब यांनी बेंद्री गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल व पुढील आठ दिवसांत गावाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना राम पाटील चिखलिकर, ज्ञानेश्वर पाटील बेंद्रिकर, अरुण पाटील हासनाबादे, निळकंठ साहेब (आर्मी), सुनील पाटील बेंद्रिकर, अजित पाटील बेंद्रिकर, माधव पाटील, दत्ता मंगरुळे बेंद्रिकर, जनार्धन टोंपे, बसवेश्वर पाटील बेंद्रिकर, पोलीस पाटील गोविंद बेंद्रिकर, बालाजी माचापूरे, सचिन पाटील कदम, परमेश्वर पाटील कदम, कपिल हासनाबादे तसेच गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर बेंद्री ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल. बेंद्री गावाला अखंड वीजपुरवठा मिळावा, हीच सर्व ग्रामस्थांची प्रमुख मागणी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



