ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव पोलिसांची दादागिरी ; अतिक्रमणांकडे डोळेझाक, तर आपत्कालीन फोनवर बोलणाऱ्या पत्रकाराला ठोठावला दंड!

मुख्य चौकातील वाहतूक कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष ; खाजगी ट्रॅव्हल्स आणि पोलिसांचे 'अर्थपूर्ण' संबंध?

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : नायगाव तालुक्यातील मुख्य हेडगेवार चौकात आणि नरसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज वाहनांचे मोठे अतिक्रमण आणि बेकायदेशीर पार्किंग होत असताना, स्थानिक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, याच चौकात एका आपत्कालीन (Emergency) फोन आल्यामुळे रस्त्याच्या बाजूला गाडी लावून बोलत उभे असलेले स्थानिक पत्रकार प्रकाश महिपाळे यांच्यावर पोलिसांनी सूडबुद्धीने कारवाई करत ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पोलिसांच्या या एकतर्फी आणि अरेरावीच्या कारवाईमुळे नायगाव तालुक्यातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आज (३० जून २०२६ रोजी) पत्रकार प्रकाश महिपाळे हे हेडगेवार चौकातून जात असताना त्यांना एक अत्यंत महत्त्वाचा आपत्कालीन फोन आला. रस्त्याच्या मध्यभागी फोनवर बोलणे अयोग्य असल्याने त्यांनी आपली दुचाकी (क्र. MH26BK9797) रस्त्याच्या अगदी बाजूला घेतली आणि ते फोनवर बोलत होते. एरवी या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी हजर नसतो. परंतु, आज अचानक पोलीस कर्मचारी शेरीकर यांनी तिथे येऊन पत्रकार महिपाळे यांच्या गाडीवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली.

महिपाळे यांनी ‘आपत्कालीन फोन असल्याने मी रस्त्याच्या बाजूला उभा आहे’ असे वारंवार सांगितले, तरीही पोलीस कर्मचाऱ्याने त्यांचे काहीही ऐकून न घेता थेट ‘मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७’ अन्वये ५०० रुपयांचा ऑनलाईन चालान (Challan No. NANCM26006198218) फाडला. या कलमानुसार, वाहन सार्वजनिक ठिकाणी सोडून देणे किंवा अडथळा निर्माण केल्यास दंड होतो. मात्र, चालक स्वतः गाडीवर बसलेला असताना आणि गाडी बाजूला असतानाही हा दंड लावण्यात आल्याने पोलिसांच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे.

पत्रकार महिपाळे यांनी जेव्हा पोलीस कर्मचाऱ्याला विचारले की, “चौकात इतर अनेक वाहने रस्त्याच्या मधोमध उभी आहेत, नरसी रस्त्यावर ऑटोवाल्यांनी अर्धा रस्ता अडवला आहे, त्यांच्यावर कारवाई का करत नाही?” तेव्हा पोलीस कर्मचारी शेरीकर यांनी बाजूला उभ्या असलेल्या केवळ एका गाडीवर दंड लावल्याचा खोटा देखावा केला. त्यानंतर समोर उभ्या असलेल्या बेकायदेशीर ऑटो चालकांवर कारवाई करण्यास सांगितले असता, त्यांना दंड न लावता “गाडी पोलीस स्टेशनला घे” अशी दमदाटी करत ते ऑटो चालकाला घेऊन निघून गेले.

मात्र, त्या ऑटोवर खरोखर काय कारवाई झाली की त्याला सोडून देण्यात आले, हा विषय अद्याप गुलदस्त्यात आहे. या संदर्भात ठाणे प्रमुख अमोल भगत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “ठीक आहे, मी काय प्रकार आहे ते पाहतो,” असे मोघम उत्तर देऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

नायगाव शहरात सकाळी ९ ते १० आणि दुपारी ३ ते ४ या शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. बस थांबा आणि मुख्य चौकात खाजगी ट्रॅव्हल्स आणि इतर वाहने रस्त्याच्या मधोमध उभी केली जातात. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून, तारेवरची कसरत करत रस्ता ओलांडावा लागतो. या खाजगी वाहनधारकांमुळे दररोज अपघात सदृश परिस्थिती निर्माण होते. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांवर कधीच कारवाई करत नाहीत. यामुळे “पोलीस आणि खाजगी ट्रॅव्हल्स चालकांमध्ये नेमके काय आर्थिक संबंध आहेत?” असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

एकीकडे रस्त्याच्या बाजूला उभ्या राहणाऱ्या सर्वसामान्यांवर आणि पत्रकारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करणारे नायगाव पोलीस गुन्हेगारी रोखण्यात मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत. कालच नायगाव शहरात तब्बल ९ लाख ७० हजार रुपयांची मोठी चोरी झाली आहे. या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जनतेचा सवाल आहे की, “जी तत्परता पोलीस एका पत्रकाराला दंड लावण्यात दाखवतात, तीच तत्परता चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात का दाखवली जात नाही? पोलिसांचा धाक केवळ गरिबांवर आणि सामान्यांवरच आहे का?”

या संपूर्ण प्रकारामुळे नायगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून हेडगेवार चौकातील खरे अतिक्रमण हटवावे आणि पोलिसांची दादागिरी थांबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker