नांदेड जिल्हा परिषदेत चौकशी व कारवाईचे प्रकरण सात वर्षांपासून प्रलंबित : 15 आँगस्टला बेशरमाचे फुल देवून स्वागत करण्याचा अँड.कांबळे यांचा इशारा

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : दिलेल्या तक्रारीचे वेळेत दखल घेवून प्रकरण निकालीन काढता सात सात वर्षें प्रलंबित ठेवण्याच्या जिल्हा परिषदेच्या प्रकाराला अँड. बालाजी कांबळे हे अक्षरशः वैतागले आहेत. जिल्हा परिषदेच्या वेळकाढू धोरणामुळे वैतागलेल्या कांबळे यांनी ता. १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना बेशर्माचे फुल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
मागील ७ वर्षापासून जिल्हा परिषद, नांदेड प्रशासनाकडे विविध विषयां संदर्भात चौकशी करुन दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत वारंवार तक्रार/निवेदन देण्यात येत आहेत. तसेच याबाबत मा.विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर व शासनांकडून सुध्दा मागील ७ वर्षापासून खालील नमूद विषयांवर योग्य ती कार्यवाही/चौकशी करुन तक्रारदारास व विभागीय आयुक्त/शासनास कळविणेबाबत वारंवार अवगत करण्यात येत आहे. तरी सुध्दा जिल्हा परिषद, नांदेड प्रशासनाने खालील विषयांवर आज रोजीपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करुन प्रकरणं अंतिमतः निकाली काढले नाहीत.
जिल्हा परिषद, नांदेड प्रशासनाने प्रलंबित विषयांवर नियमानुसार कार्यवाही करुन विषय निकाली काढण्यात दिरंगाई केल्यामुळे दिनांक १५ ऑगस्ट २०२२, दिनांक १४ एप्रिल २०२३ व दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी आत्मदहन करणार असल्याबाबत लेखी निवेदन दिले होते. तथापी सर्व प्रलंबित विषयी तात्काळ निकाली काढण्यात येथील असे लेखी आश्वासन देऊन सुध्दा प्रशासनाने आज रोजी पर्यंत (मागील ६-७ वर्षापासून) ठोस कार्यवाही करुन प्रकरण अंतिमतः निकाली काढले नाहीत.
शासन नियमानुसार विभागास प्राप्त तक्रार/निवेदन ९० दिवस/१२ आठवडयात अंतिमतः निकाली काढणे आवश्यक असून या संदर्भात मा.उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरी सुध्दा जिल्हा परिषद, नांदेड प्रशासनाने शासकीय नियमांचे उल्लंघन करुन त्यांचे पदाचे कर्तव्य बजावण्यात कसूर केला आहे.
वारंवार विनंती करुन सुध्दा जिल्हा परिषद, नांदेड प्रशासन जागे होत नसल्यामुळे सर्व संबधीत अधिकारी/कर्मचारी यांचा दिनांक १५/०८/२०२४ रोजी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे वेळ मिळणेसाठी दिनांक ०६/०८/२०२४ रोजी अँड बालाजी दत्ता कांबळे यांनी लेखी निवेदन दिले असून यावर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.