पीक विम्याचा २६७.३ कोटी रुपयांचा थकीत वाटा तात्काळ अदा करा
संधी मिळतात खा.रवींद्र चव्हाण यांनी पहिली मागणी केली शेतकरी हिताची

प्रकाश महिपाळे
नायगाव : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक विमा रकमेचा केंद्र सरकारचा वाटा २६७.३ कोटी रुपये अद्याप मिळालेला नाही. केंद्राच्या वाट्याची ही रक्कम न मिळाल्यास तमाम लाभार्थी शेतकरी पीक विमा योजने पासून वंचित राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित आपल्या हिश्याची रक्कम द्यावी व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी लोकसभेत केली. विशेष म्हणजे सभागृहात बोलण्याची संधी मिळताच खासदार चव्हाण यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या हिताचा व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न उचलून धरला.
लोकसभेत सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात खासदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमापोटी मिळणारी एकूण रक्कम सुमारे ६१७ कोटी रुपये आहे. यापैकी केन्द्र सरकारचा हिस्सा २६७.३ कोटी रुपये असून तो हिस्सा अद्यापही मिळालेला नाही. या उलट महाराष्ट्र सरकारने आपला ३४९.७ कोटी रुपयांचा वाटा याआधीच उपलब्ध करून दिला आहे. केन्द्र सरकारकडे २६७.३ कोटी रुपये थकीत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी व एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये या भूमिकेतून केंद्र सरकारने आपल्या हिश्याची २६७.३ कोटी रक्कम त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ सहन करावा लागतो. परिणामी शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले जाते. याची जाणीव असल्याने खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी लोकसभेतील आपल्या पहिल्याच प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधल्याने तमाम शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.