पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व रस्ते दिवे दुरुस्त करा ; अन्यथा अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा!
जनता दलाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव पटणे यांचे बावलगाव ग्रामपंचायतीला निवेदन

New Bharat Times नेटवर्क
बिलोली :- पावसाळा तोंडावर आलेला असताना मौजे बावलगाव येथील विविध वार्डांमधील तुंबलेल्या नाल्यांची तात्काळ साफसफाई करावी, बंद असलेले रस्ते दिवे दुरुस्त करावेत आणि पावसाळ्यापूर्वी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जर वेळेत कामे न झाल्याने भविष्यात काही समस्या उद्भवल्या, तर त्याला सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार असेल आणि त्यांच्यावर कारवाई निश्चित करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी जनता दल (सेक्युलर) चे जिल्हा उपाध्यक्ष माधव लालप्पा पटणे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

माधव पटणे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, बावलगाव येथील अनेक वार्डांमधील नाल्या सध्या कचरा आणि गाळाने पूर्णपणे तुंबलेल्या आहेत. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने, जर या नाल्यांची वेळेत साफसफाई झाली नाही, तर पावसाचे पाणी रस्त्यांवर आणि नागरिकांच्या घरात शिरण्याची दाट शक्यता आहे.
“साचलेल्या घाण पाण्यामुळे गावात डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, गॅस्ट्रो यांसारख्या गंभीर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन तातडीने नालेसफाई व औषध फवारणी करावी.” — माधव पटणे (जिल्हा उपाध्यक्ष, जेडीएस)
नालेसफाईसोबतच गावातील अंतर्गत रस्त्यांवरील पथदिव्यांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. गावातील अनेक वार्डांमध्ये रस्ते दिवे बंद असून काही ठिकाणी प्रकाशव्यवस्था अत्यंत अपुरी आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले होते. आता त्यात अंधाराची भर पडल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी चालणेही कठीण होईल. त्यामुळे प्रत्येक वार्डातील विद्युत खांबांची तपासणी करून बंद दिवे त्वरित सुरू करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रमुख मागण्या गावातील सर्व तुंबलेल्या नाल्यांची तातडीने साफसफाई करून गाळ व कचरा हटवणे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात नियमित कीटकनाशक व औषध फवारणी करणे. पावसाळ्यापूर्वी गावात विशेष स्वच्छता मोहीम राबवणे. सर्व प्रभागांमधील बंद रस्ते दिवे दुरुस्त करणे व आवश्यक तिथे नवीन दिवे बसवणे.
या निवेदनाची ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी पटणे यांनी केली आहे. जर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावात रोगराई पसरली किंवा नागरिकांना त्रास झाला, तर जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती पुढील कारवाईसाठी नांदेडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) तसेच बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.



