रस्त्यात अडवून लूटमार करणाऱ्यांना रामतीर्थ पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात केले जेरबंद

मोरे मनोहर
किनाळा :- रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरसी ते बिलोली महामार्गावर दिनांक 11 जून रोजी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास जिगळा तालुका बिलोली येथील रावसाहेब विठ्ठल येरडे यांची मोटरसायकला अडवून धाक दाखवत लुटमार करणाऱ्यांना अवघ्या पाच दिवसात रामतीर्थ पोलिसांनी दोघा जणांना जेरबंद करून रामतीर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.
अधिक माहिती अशी की नरसी ते बिलोली महामार्गावर दि.11 जुन रोजी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास जिगळा तालुका बिलोली येथील रावसाहेब विठ्ठल येरडे हे मोटारसायकल वरून घराकडे जात असताना अज्ञात दोन व्यक्ती मोटार सायकल अडवून धाक दाखवत त्यांच्याकडील ओप्पो कंपनीचा मोबाईल व नगदी 2500 रुपये बळजबरी काढून घेऊन गेले असल्याने याप्रकरणी रावसाहेब एरडे यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दिली असता या प्रकरणी सदरील अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.
रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी या बळजबरी चोरीचा छडा लावण्यासाठी तपासाची सूत्र हाती घेत जिल्हा पोलीस अधीक्षक, व बिलोली येथील पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून सय्यद अरफत सय्यद हुसेन रा. मलंग बाबा जवळ देगलूर नाका नांदेड, व शेख अरबाज शेख अजित राहणार इतवारा नांदेड यांना पकडून त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदरील गुन्हा केल्याचे कबूल केले असता त्यांनी बळजबरी चोरी केलेला मोबाईल व त्यांच्याकडे असलेला खंजर असा एकूण पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुरन 122/ 2026 कलम 309(4)126(2)3(5) भारतीय न्याय संहिते नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील बळजबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व बिलोली येथील पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रमुनी सोनकांबळे, काळे यांनी परिश्रम घेत गुन्हा घडल्यापासून अवघ्या पाच दिवसाच्या आत महामार्गावर गाड्या अडवून बळजबरी चोरी करणाऱ्या दोन चोरांना जेरबंद करण्यात रामतीर्थ पोलिसांना यश आल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.



