अखेर दाजींनी सोडली भावजीची साथ : भास्कररावांचे लोकसभेला रवींद्र चव्हाणांनाच बळ : मात्र नायगाव विधानभेला डॉ.मिनल खतगावकर

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर भाजपने मला प्रस्ताव देवून डॉ.मिनल खतगावकर यांना लोकसभेला उभ करा अशी आँफर दिली होती पण मी वसंतराव गेल्यानंतर त्यांच्या मुलाच्या विरोधात आमच्या घरातल कुणीच उभ राहणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे लोकसभेसाठी प्रा.रवींद्र चव्हाण यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभ राहणार असल्याचा शब्द खातगावकरांनी दिला असून विधानसभेला मात्र डॉ.मिनल खतगावकरच असणार आहेत.

माजी खा. भास्कररराव पाटील खतगावकर काँग्रेस पक्षात जाणार असल्याची जोरदार चर्चा होत असतानाच त्यांनी दि.१२ सप्टेंबर रोजी शंकरनगर येथे कार्यकर्त्याची संवाद बैठक घेतली. यावेळी अनेकांनी खातगावकरांनी यापुर्वी काँग्रेस पक्ष सोडण्यात चुक झाली असल्याचे बोलून दाखवले. आपण काँग्रेस पक्षात राहीला असतात तर आज चित्र वेगळे राहीले असते अशा भावना अनेकांनी जाहीर व्यासपीठावरुन व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यावर खतगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भाजपमध्ये गेल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे काम केले पण भाजपने अन्याय केला.
अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्याने ते मंत्री होतील आणि नांदेड जिल्ह्याचा विकास होईल अशी भावना माझ्या मनात होती. भाजपवाल्यांनी अशोकराव यांना थप्पीला लावलेत त्यांना बाहेरही निघता येईना आणि स्वतःच दुखणे ही सांगता येईना अशी अवस्था करुन टाकली आहे. खा.वसंतराव यांच्या निधनानंतर भाजपने मला प्रस्ताव दिला आणि लोकसभेसाठी डॉ. मिनल खतगावकर यांना उभ करा. मी त्यांना हात जोडून नकार दिला. वसंतराव गेल्यानंतर त्यांच्या मुलाच्या विरोधात आमच्या घरातल कुणीच उभ राहणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. आम्ही राजकारणी असलो तरी काही नियम असतात ते आम्ही पाळणारे आहोत असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
वसंतराव चव्हाण यांना जनतेने पाच वर्षासाठी निवडून दिले होते पण नको ते घडल. त्यानंतर जिल्हा काँग्रेसने एकीकडे लोकसभेसाठी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली. तर दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून डॉ. मिनल खतगावकरांना विधानसभेला उभ करा असा निरोप आल्यामुळे मी ही संवाद बैठक आयोजित केली. आपण सर्वजन एकमताने ठराव करुन लोकसभेसाठी रवींद्र चव्हाण तर विधानसभेला डॉ. मिनल खतगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर राजूरकर श्रीराम, सरजितसिंग गिल, बाळासाहेब खतगावकर, डॉ.मिनल खतगावकर, भिमराव जेठे, जीवन चव्हाण, सुरेश खंडगावकर, मसूद देसाई, येसगीकर शिवा पाटील उपस्थित होते. तर दत्ताहरी कावलगुडेकर, भावना दाशेटवार, भिमराव जेठे, गणपतराव धुप्पेकर, संभाजी शिंदे मांजरमकर, बाळू मुदखेडे, गणपतराव धूप्पेकर, नागनाथ अनंतवाड, शेख गौस, मेहताब पठाण, मारोती पटाईत, साई सुगावे या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपली भावना व्यक्त केल्या.