पहील्या चोरीचा तपास लागलेला नसताना पुन्हा एटीएम फोडून चार लाखाची रोकड लंपास : रामतीर्थ पोलीसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : रामतीर्थ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या आंतरावर असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मधून चोरलेल्या 20 लाखाच्या चोरीच्या प्रकरणाचा तपास 13 महिण्यानंतरही लागला नसताना चोरट्यांनी रामतीर्थ येथे पुन्हा दि. 19 रोजी रात्री एटीएम फोडून चार लाखाची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे रामतीर्थ पोलीसांच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त तर करण्यात येतच आहे पण त्यांची रात्रीची गस्तही कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले.
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढलेल्या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून चोरीच्या घटनामध्येही बरीच वाढ झाली आहे. चोरीच्या घटना होत असल्या तरी आरोपी मात्र सापडत नसल्याने ज्यांच्या घरी किंवा दुकानात चोरीच्या घटना घडल्या आहेत अशांना अर्थिक झळ बसत आहे. परंतु आपल्याच मस्तीत असलेल्या रामतीर्थ पोलीसांना याचे काहीही सोयरसुतक नाही हे विशेष. अवैध वाळूच्या वसुलीसह अन्य कामात रामतीर्थची यंत्रणा व्यस्त असल्याने रात्रीची गस्त केवळ कागदावरच असते तर दुसरीकडे ठाणेदार हे ठाण्यात कमी नरसी चौकातच वावरत असल्याने गुन्हेगारांना मैदान मोकळे झाले आहे.
मागच्या वर्षी दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी एसबीआय बँकेचे एटीएम गँस कटरने कापून 20 लाख 43 हजाराची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व रामतीर्थ पोलिसांनी केला परंतु एका वर्षानंतरही या चोरीच्या घटनेतील आरोपी सापडले नाहीत. या चोरीच्या तपासात रामतीर्थ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे होती मात्र त्यांनी आजपर्यंत काहीही केले नाही. मागच्या वर्षीच्या या चोरीचा तपास गुलदस्त्यात असल्याने मनोधैर्य उंचावलेल्या चोरट्यांनी पुन्हा दि. 19 आक्टोबर च्या रात्री 1 वाजताच्या दरम्यान एटीएम गँस कटरने कापून जवळपास पाच लाखाची रोकड लंपास केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
चोरट्यांनी चोरी करण्याच्या अगोदर सी सी टिव्ही कँमेऱ्याचे वायर तोडले व कँमेऱ्यावर स्प्रे मारला. विशेष म्हणजे याच ठिकाणी मागच्या वर्षी चोरी करतांना चोरट्यांनी हीच पध्दत वापरली होती. चोरीच्या घटनेची माहिती रविवारी दुपारी रामतीर्थ पोलिसांना समजली. त्यामुळे रामतीर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ठसे तज्ञासह श्वान पथकाला पाचारण केले. मात्र ठसे तज्ञ आले होते परत 3.30 वाजेपर्यंत श्वान पथक आले नव्हते. आजुबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे.
मागच्या वर्षी चोरी झाल्यानंतर सदरचे एटीएम बंदच होते मात्र काही दिवसापूर्वी पुन्हा चालू करण्यात आले आहे. परंतु याबाबत कसलीच माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. पोलिसांना माहिती देण्याबाबत रिजर्व बँकेचे नियम आहेत पण याबाबत पोलीसांनाच अंधारात ठेवण्यात आले. चोरीची घटना घडल्यानंतर एटीएम सुरु करण्यात आल्याचे कळले.
विक्रम हाराळे, सहायक पोलीस निरीक्षक, रामतीर्थ.



