शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच बांधली तहसील कार्यालयाच्या गेटला ; अधिकारी कर्मचारी तहसील कार्यालयात अडकले

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज आसूड मोर्चा काढला, या मोर्चात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच तहसील कार्यालयाच्या गेटला बांधल्यामुळे तहसीलचे अधिकारी कर्मचारी नागरीक मध्ये अडकून पडले आहेत. ई पीक पाहनी नोंदणी रद्द करून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात यावी, गतवर्षीचा पिक विमा सरसकट देण्यात यावा, तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात यावे.
स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात, सिबिलची अट रद्द करण्यात यावी, 7/12 ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशा विविध मागण्या घेऊन नायगावचे हेडगेवार चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत ०५ किलोमीटर चालत शेतकरी- महिला मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होते.
तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर बराच वेळ होऊनही अधिकारी दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला आहे. मोर्चाचे तहसील कार्यालयाच्या गेटवरच सभेमध्ये रूपांतर झाले आणि यावेळी शेतकरी पुत्रांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या.
रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, किसान ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉ दत्ता मोरे देगांवकर , शेतकरीपुत्र श्याम पाटील वडजे, युवा नेते गजानन चव्हाण,छावा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे,प्रवीण बैस, बळवंत शिंदे या शेतकरी पुत्रांनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शिवराज पाटील होटाळकर, साहेबराव चट्टे, रणजित देशमुख, हनुमंत शिंदे, देवीदास पाटील आणि तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.