नरसीत लाँजींगच्या नावावर चालतो वेश्या व्यवसाय : ग्रामस्थांचा आंदोलनाचा ईशारा

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : मागील दोन तीन वर्षांपासून नरसी येथे लाँजींगच्या नावाखाली प्रस्थापित व मातब्बर मंडळींनी चक्क वेश्या व्यवसायाची दुकानदारी थाटल्याने नरसी हे वेश्या व्यवसायाचे केंद्र म्हणून परिचित झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत. या प्रकराला पायबंद घालण्याऐवजी पोलीसांनी पाँकेट संस्कृती सुरु केली आहे. वेश्या व्यवसायाच्या विरोधात ग्रामपंचायत व नागरिक आक्रमक झाले असून तत्काळ हा धंदा बंद करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने रामतीर्थच्या ठाणेदाराची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले.

नायगाव नंतर तालुक्यातील दुसरे मोठे गाव हे नरसी असून येथे चौरस्ता असल्याने येथून तेलंगणा व कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्यामुळे नरसीची एक वेगळी ओळख आहे. परंतु मागच्या काही वर्षापासून वेश्या व्यवसायाचे गाव म्हणून नवीन ओळख निर्माण झाली आहे. नरसी चौरस्ता असल्याने येथे नियमित गर्दी असते विशेष म्हणजे नरसीच्या चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होते याकडे रामतीर्थ पोलीसांचे लक्ष नसते पण कोणत्या लाँजवर कोण आहे याकडे लक्ष असते कारण यातून मलिदा मिळतो.
नरसीत सततची वर्दळ असल्याने आणि दुरच्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी मुक्कामाची सोय व्हावी या उदात हेतूने सुरुवातीला लाँज सुरु झाल्या. पण यातूनही कमाई करता येते हे लक्षात येताच अनेक प्रस्थापित व मातब्बर मंडळी लाँजींगच्या व्यवसायत उतरले. नरसी परिसरात पाच ते सहा लाँजींग सुरु झाल्या. याचा फायदा आंबटशौकीन लाभ घेण्यास सुरुवात केली. कारण थोड्या वेळात जास्त कमाई होत असल्याने लाँज चालकही खोल्या देवू लागले. वेश्या व्यवसायातूनही बक्कळ कमाई होत असल्याने काही लाँज मालक लाँजवरच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ठेवू लागले तर काहीजन दलालामार्फत हा व्यवसाय सुरु केला.
नरसी व परिसरात चालणाऱ्या लाँजचे मालक प्रस्थापित तर आहेतच पण बड्या राजकीय नेत्यांच्या वर्तूळात वावरणारे असल्याने त्यांच्याबद्दल भ्र शब्द काढायची कुणाची हिम्मत नसल्याने शाले व महाविद्यालयीन तरुण तरुणींची लाँजवर येण्याचे प्रमाण लाढले. या लाँजींगमुळे तरुण पिढी वाममार्गाला तर लागतच आहे पण याचा सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास होवू लागला. विशेषतः नरसी ग्रामस्थांचे बाहेर गावचे नातेवाईक या वेश्या व्यवसायाची चर्चा करत असल्याने नरसी हे वेश्या व्यवसायाचे गाव म्हणून परिचय झाले.
वेश्या व्यवसाय हा नरसीच्या वैभवाला लागलेला कलंक असल्याने अनेकांनी रामतीर्थ पोलीसाकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या पण नियम व कायद्यावर बोट ठेवून वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देत असल्याने नरसीचे ग्रामस्थ आक्रमक झाले. काल दि.५ जुन रोजी नरसी चौकीत पोलीस, लाँज चालक आणि ग्रामस्थांची बैठक झाली यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी लाँज मालक व चालकांच्या कुळाचा जाहीर उध्दार केला पोलिसांनाही तंबी दिली. दोन तीन दिवसात नरसीतील वेश्या व्यवसाय बंद न झाल्यास ग्रामपंचायतच्या पुढाकारातून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.