नरसीत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर हातोडा

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नांदेड जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणा-या नरसी येथील चौकाच्या अजुबाजूसह चारही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले चौकाचा श्वास कोंडला होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. दुसरीकडे विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना चक्क रस्त्यावरच वाहणे उभे करावे लागत असल्याने वाहतुकीची कोंडी होवून वाहणांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ग्रामपंचायतने गुरुवार पासून पोलीसांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.

नरसी शहराची झपाट्याने वाढ होत आहे. येथे मुख्य बाजारपेठ असुन येथून तेलगंणा , आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यासह अनेक राज्यातील वाहनांची ये जा असते. दररोज हजारो वाहने व प्रवाशी येथून जात असतात चोवीस तास रहदारी चालु असते पण येथील चारही रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने वारंवार वाहतुक ठप्प होत आहे. वाहतुक ठप्प झाल्यावर ती वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलीसांना मोठी कसरत करावी लागत असते.

या चौकातील वाढलेल्या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायतकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. ग्रामपंचायत अनेकवेळा या अतिक्रमण धारकांना सुचना दिल्या पण काहीही फरक पडला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतने रामतीर्थ पोलीसांची मदत घेवून अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेवून बुधवारी सकाळपासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. पोलीसांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साह्याने चौकापासून बिलोली कडे जाणा-यां रस्त्यावरील दोन्ही बाजुने अतिक्रमण काढण्यात आले असून गुरुवारीही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. अनेक वर्षापासून नरसी येथे वाढलेले अतिक्रमण बुधवारी काढल्याने चौकापासून बिलोली कडे जाणारा रस्ता मात्र मोकळा दिसत आहे.
नरसी चौकातील चारही रस्त्यावर ज्यांची दुकाने आहेत त्यांनीच आपल्या दुकानासमोर अतिक्रमण करुन पोट भाडेकरू ठेवले व त्यांच्याकडून भाडे वसूल करत असतात. या अतिक्रमण हटावमुळे रस्त्यावर अतिक्रमण करुन भाडे वसूल करणारे मात्र हिरमुसल्याचे दिसून आले.