एक्सप्रेस रेल्वेला उमरीत थांबा द्यावा आणि रायलसिमा एक्स्प्रेसचा नांदेड पर्यंत विस्तार करा
खा.वसंतराव चव्हाण यांची रेल्वे मंत्र्याकडे मागणी

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नांदेड ते मुंबई जाण्यासाठी रेल्वेची संख्या कमी असल्याने दोन नवीन रेल्वे सुरु करण्यात याव्यात. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोईसाठी राज्यराणी एक्सप्रेसला दादर येथे थांबा देण्यात यावा आणि निझाबाद ते तिरुपती जाणारी राँयलसिमा एक्सप्रेस नांदेड येथून सुरू करावी. विशेष म्हणजे नांदेड ते तेलंगणात जाणाऱ्या पाच रेल्वेला उमरी येथे थांबा द्यावा अशी आग्रही मागणी खा. वसंतराव चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी नुकतेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्येबाबत निवेदन देवून विविध मागण्या तर केल्याच आहेत पण नवीन रेल्वे सुरु करण्याचीही मागणी केली आहे. त्यांनी नांदेड ते मुंबई जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे पण प्रवाशांना आरक्षण मिळतच नाही परिणामी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे नांदेड ते मुंबई जाण्यासाठी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून नांदेड ते परल (मुंबई) एक मनमाड मार्गे व दुसरी लातूर मार्गे रेल्वे सुरु करावी. नांदेड ते मुंबई ही राज्यराणी एक्सप्रेस दररोज धावते पण ती दादर स्टेशनला थांबत नाही. यामुळे कामासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हि होणारी गैरसोय लक्षात घेवून राज्यराणी एक्सप्रेसला जातांना आणि येतांना दादर येथे थांबा द्यावा अशीही मागणी केली आहे.
तिरुपतीला जाणाऱ्यांची नांदेड जिल्ह्यातील संख्या मोठी आहे त्या तुलनेत रेल्वेही कमीच आहेत पण जी निझामाबाद येथून तिरुपतीला राँयलसिमा एक्सप्रेस जाते ती रेल्वे वेळेत जात असल्याने या रेल्वेचे तिकीट व आरक्षण मिळण्यासाठी भाविक नेहमीच प्रयत्न करत असतात पण ते शक्य होत नाही त्यामुळे निझामाबाद ते रायलसीमा जाणाऱ्या १२७९३ व १२७९४ या रेल्वेचा विस्तार करुन त्या नांदेड येथून सुरु करण्यासाठी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी विनंती खा.वसंतराव चव्हाण यांनी केली आहे.
नांदेड येथून ओखा- रामेश्वरम एक्सप्रेस, नगरसोल – नरसापूर एक्सप्रेस, साईनगर – तिरुपती एक्सप्रेस, नांदेड – विशाखापट्टणम एक्सप्रेस आणि जयपूर – हैदराबाद एक्सप्रेस या पाचही रेल्वे उमरी येथूनच पुढे जाता आणि या रेल्वेला नायगाव विधानसभा मतदारसंघातील धर्माबाद येथे थांबा आहे पण उमरी येथे थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एकत नांदेडला नाही तर धर्माबादला जावे लागते. त्यामुळे या रेल्वेला उमरी येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी केली आहे.