लक्ष्मीकांत कलमुर्गे यांच्यावरील खोटा गुन्हा रद्द करा ; पत्रकार संरक्षण समितीची मागणी

New Bharat Times नेटवर्क
बिलोली :- सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मीकांत कलमुर्गे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून त्याची निष्पक्ष चौकशी करून तो तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली तसेच पोलीस निरीक्षक बिलोली यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लक्ष्मीकांत कलमुर्गे हे अनेक वर्षांपासून सामाजिक व पत्रकारितेच्या माध्यमातून जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. उपजिल्हा शासकीय रुग्णालय बिलोली येथील आरोग्य सेवा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, पोषण आहार वितरण तसेच विविध शासकीय योजनांतील त्रुटींबाबत त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी व निवेदने सादर केली आहेत.
याच जनहिताच्या कार्यामुळे काही संबंधित व्यक्तींनी संगनमताने त्यांच्याविरुद्ध खोटे व द्वेषभावनेतून प्रेरित आरोप करून गुन्हा दाखल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदारांच्या आरोपांची सत्यता सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब तसेच उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पडताळण्यात यावी. चौकशीत आरोप खोटे अथवा दिशाभूल करणारे असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित गुन्हा रद्द करून खोटी तक्रार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण मिळणे ही लोकशाहीची गरज असल्याचे सांगत, या प्रकरणात न्याय्य व निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी पत्रकार संरक्षण समितीने केली आहे.



