धर्माबाद शहरात आ.राजेश पवारांच्या विरोधात निघाला प्रचंड मोठा जनाक्रोश मोर्चा : व्यापारपेठ कडकडीत बंद

New Bharat Times नेटवर्क
धर्माबाद : लिंगायत समाजाच्या तरुणावर गुन्हे नोंद करायला लावल्या प्रकरणी धर्माबाद येथे आ. राजेश पवार यांच्या हुकूमशाही विरोधात प्रचंड मोठा जनआक्रोश मोर्चा काढून लिंगायत समाजाने निषेध केला आणि खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तर स्थानिक व्यापाऱ्यांनीही आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून आक्रोश मार्चाला पाठींबा दिला. आमदाराच्या विरोधात पहील्यांदाच एवढा मोठा मोर्चा निघाल्याने जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

धर्माबाद शहरात आ. राजेश पवार यांनी २६ जून रोजी जनता दरबार आयोजीत केला होता. या दिवशी शहरात मनसेच्या वतीने आमदार साहेब, लोकसभा निवडणुकीतून काहीतरी बोध घ्या; हिंदूंनी तुम्हाला भरभरून मते दिली तरीही त्यांच्या स्मशान भूमी व इतर विकासाकडे आपल्याला का विसर पडतो! अशा आशयाचे बॅनर लावण्यांत आले. ही बाब मूळ वादाचे कारण बनली आणि तदनंतर भाजपा तालुकाध्यक्ष विजय डांगे यांच्या फिर्यादी वरुन मनसेचे शहर अध्यक्ष सचिन रेडी व हणमंत कते या युवका विरुध्द धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हणमंत कते या युवकाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, किंवा या प्रकारात कसल्याही प्रकारचा सहभाग नसतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने वीरशैव लिंगायत समाजात तिव्र असंतोष पसरला होता आणि आ. राजेश पवार याच्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत होता. दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत अन्यथा दि. 4 जुलै रोजी धर्माबाद बंदची हाक देण्यात आली होती आणि शहरात आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आल्यानंतरही आमदाराची अरेरावी सुरुच होती.

आक्रोश मोर्चाचा इशारा दिल्यानंतर मोर्चाला विविध सामाजिक संघटना, समाजाचे प्रतिनिधी, हिंदुत्ववादी संघटनां आदी सह सुमारे ३६ पाठिंबा दिला. बसवआण्णा हिल्स येथून सदरील जनआक्रोश मोर्चाची सुरुवात झाली तदनंतर मुख्य मार्गावरून हा प्रचंड मोठा मोर्चा पोलीस ठाण्यात पोहचला. तिथे निवेदन देण्यात आले आणि शेवटी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठान कडकडीत बंद ठेवून आंदोलनाला पाठींबा दर्शवला.
धर्माबाद शहरात निघालेल्या या प्रचंड मोठ्या आक्रोश मोर्चात लिंगायत समाजाच्या तरुणांनी आ.राजेश पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात असा मोर्चा पहील्याच निघाला आहे.
सर्वसामान्य गोर गरीबांच्या मुलांवर गुन्हे दाखल करणाऱ्या आ.राजेश पवार यांच्या अनेक बेनामी संपतीची परिपूर्ण यादी माझ्याकडे आहे. आ. पवार यांच्यावर करवाई करून प्रशासनाने कायद्याचा धाक दाखवून द्यावा अशी मागणी शिवा संघटना संस्थापक अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांनी यावेळी केली आहे.
धर्माबाद शहरातील एका जेष्ठ पत्रकाराचा आ. राजेश पवारांच्या सौभाग्यवतीने अपमान केल्याची घटना घडल्यानंतर पत्रकार संघटनेने निषेध करुन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी निघालेल्या आक्रोश मोर्चामुळे आ.राजेश पवार यांची प्रतिमा डागाळली आहे.
दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे न घेतल्यास पुढील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.