नवीन शैक्षणिक धोरणाची शरदचंद्र महाविद्यालयात अंमलबजावणी : प्राचार्य डॉ.के.हरिबाबू

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, समाजातील सामाजिक व अर्थिक विषमता दुर करणे, सर्वसमावेशक आणि पाहिजे तसे शिक्षण मिळावे, शैक्षणिक संधीमध्ये समानता वाढवणे, कौशल्य आधारित शिक्षण, पाठ्यपुस्तकावरील अवलंबित्व कमी करुन करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात असा उद्देश नवीन शैक्षणिक धोरणाचा आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शरदचंद्र महाविद्यालय सज्ज असून त्यानुसार बदल करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. के. हरिबाबू यांनी दिली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शरदचंद्र महाविद्यालय सज्ज असल्याची माहिती देण्यासाठी मंगळवारी प्राचार्य डॉ. के. हरिबाबू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाची आखणी केली असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. पदवीचे शिक्षण हे आता चार वर्षाचे असून पहिल्या वर्षी सर्टिफिकीटचे प्रमाणपत्र मिळेल, दुसऱ्या वर्षी डिप्लोमा प्रमाणपत्र मिळेल, तिसऱ्या वर्षी डिग्रीचे प्रमाणपत्र मिळेल तर चौथ्या वर्षी ऑनर्स प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात एखाद्या वर्षी विद्यार्थ्याने गॅप केल्यास कोणतेही नुकसान त्याचे होत नाही. त्या त्या वर्षाचे प्रमाणपत्र मिळाल्याने माझे शिक्षण अर्ध्यावरच थांबले असे होत नाही. याशिवाय कला शाखेतील विद्यार्थी कॉमर्स व सायन्स शाखेतील कोणताही विषय घेऊन शिक्षण घेऊ शकतो. तसेच बाहेरच्या विद्यापीठातील एखादा विषय घेऊन अभ्यास जरी केला तरीही त्या विषयाचे क्रेडीट त्यांच्या नावावर जमा होतात. असेही प्राचार्य डॉ.हरीबाबू यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या शंकेचे निरासनदेखील अतिशय सोप्या पध्दतीने केले.
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालय पूर्णपणे तयारी केल्याचेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयामध्ये नवीन सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्याचेही सांगितले. यावेळी उप प्राचार्य शाम पाटील व प्रा. वैभव कावडे उपस्थित होते.