महायुतीचे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार ; अमित देशमुख यांची उमरीच्या जाहीर सभेतून टिका

प्रकाश महिपाळे
उमरी : भाजपचा उमेदवार तर भ्रष्ट आहेच पण महायुतीचे सरकार भ्रष्ट आहे. महायुतीचे नेते हे पक्ष फोडणे, आमदार विकत घेणे, भ्रष्टाचार करण्याशिवाय काहीच केले नाही, दुसरीकडे राज्यात दलालाचा सुळसुळाट झाला असल्याची घनाघाती टिका काँग्रेसचे स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी उमरी येथील जाहीर सभेतून बोलतांना येथे केली आहे.

महाविकास आघाडीचे नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ उमरी येथे सभा आयोजित केली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माधवराव किन्हाळकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, लोकसभेचे उमेदवार प्रा.रविंद्र चव्हाण, नायगाव विधानसभेचे उमेदवार डॉ. मिनल खतगावकर, शिरिषराव देशमुख गोरठेकर, कैलासराव देशमुख गोरठेकर, तालुकाप्रमुख बालाजी पाटील सावंत, सुभाषराव देशमुख गोरठेकर, संभाजी भिलवंडे, भास्करराव भिलवंडे, प्रल्हाद पाटील, गोविंदराव सिंधीकर यांची प्रमुख उपस्थित होती.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की आरक्षण, महागाई, बेरोजगारी अशा सर्वच विषयात महायुती अपयशी ठरली आहे. महायुती सरकारला राज्यात जातीय सलोखा राखता आलेला नाही. महमद पैगंबर, साईबाबा यांच्या बद्दल गैरसमज निर्माण करण्यात आला. पण सरकारने गैरसमज निर्माण करणाऱ्यावर काहीच कारवाई केली नाही. महायुतीचे नेतेच बेजबाबदार वक्तव्य करुन कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न राज्यात निर्माण करत आहेत. महायुतीच्या काळात राज्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे शेतकऱ्यांना विहीर, शेततळे व गायगोठा मंजूर करतांनाही हप्ते द्यावे लागतात अशी खरमरीत टिका केली.

शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यात जायकवाडी, विष्णुपुरी व येलदरी चे असे धरण उभे केले. विकास साधला त्यानंतर भागात काहीच करता आले नाही. शंकरराव चव्हाण यांच्यामुळे नांदेड हा कॉग्रेस पक्षाचा बाले किल्ला बनला होता मात्र शंकरराव चव्हाण यांचा वारसा पुढे चालवता आला नाही अशी नाव न घेता टिका अशोकराव चव्हाण यांच्यावर केली. मराठवाड्यात लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने जो कौल दिला आहे.
त्यापेक्षा अधिक कौल यावेळी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळेल असा आशावाद व्यक्त करतांनाच त्यांनी विलासराव देशमुख यांचे सरकार त्यावेळी अल्पमतात होते. या ठिकाणी बाबासाहेब गोरठेकरानी साथ दिली त्या मोठ्या माणसाचे दर्शन करण्यासाठी मी येथे आलो.
आघाडीचा धर्म पाळून शिरिषराव देशमुख गोरठेकर यांनी माघार घेतली त्यांचे स्वागत करतो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास गोरठेकर यांना नक्कीच न्याय देण्याचे काम करू असे अमित देशमुख यांनी दिले.