महिला दिनानिमित्त कुंटूर ग्राम पंचायत च्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

New Bharat Times नेटवर्क
कुंटूर :- आज ग्राम पंचायत कार्यालय कुंटूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्राम पंचायतच्या वतीने गावातील कर्तृत्ववान महिलांचा व गावातील सर्व शाळेत असलेल्या सर्व शिक्षिका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला, अंगणवाडीत कार्यरत असलेल्या महिला व गावातील महिला बचत गटाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात स्वतःच्या हाताने घोंगडी निर्मिती करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा व इतर अनेक क्षेत्रातील महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान सोहळा ग्राम पंचायत कुंटूर च्या सरपंच सौ.आशाताई मारोतराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे.
या कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य मा.सूर्यकांत पा.कदम, ग्राम पंचायतच्या सदस्या, नंदाताई बालाजी पवार, अख्खत्तरबी इमामसाब कल्यापुरे, महिला बचत गटाच्या CRP रेखाताई कांबळे, मारोतराव पा.कदम कुंटूरकर व कुंटूर येथिल महिला बचत गटाच्या अध्यक्षा, व महिला बचत गटाच्या महिला, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका, शांती निकेतन शाळेच्या शिक्षिका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, व इतर क्षेत्रातील महिला कर्मचारी व गावातील महिला, नागरिक उपस्थित होते.
आणि महिला बचत गटाच्या CRP रेखाताई कांबळे, शिक्षिका नव्हारे मॅडम, अंगणवाडी च्या ताराबाई संगेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करतांना सौ.आशाताई कदम यांनी आपल्या मनोगतात सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करत.
आज सर्वत्र जगभर महिला दिन साजरा होत आहे सर्व महिला आज हा सन्मानाचा अभिमानाचा दिवस उत्साहाने साजरा करत आहेत आज सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचे समाजात मोलाचे काम करणाऱ्या महिलांचे गृह उद्योग चालवणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या ग्राम पंचायत च्या वतीने विविध क्षेत्रात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करावा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजित करण्यात आले आहे. आणि या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्या भाग्य मला भेटलं त्यामुळे मी खुप स्वतःला नशीबवान समजते. असे म्हणत पुढे म्हणाल्या भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे शेतीतील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत तसेच शिक्षिका, डॉक्टर, पोलीस, पोलीस निरीक्षक, तलाठी, ग्रामसेविका, पायलट, खेळाडू, अशा अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
आपल्या भारत देशामधील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. या वरून स्त्री एक आघात शक्तीचे रूप आहे हे समजते. आज इथे सर्व स्त्रिया आनंदीत आहेत.
पण जगासह राज्यात खूप मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा केला जातो त्या निमित्ताने मला असे वाटते की, खरच स्त्री स्वातंत्र झाली आहे का, हा प्रश्न समाजाला विच्यारायची वेळ आज आली आहे. आज ही समाजात स्त्री असुरक्षित आहे. तिच्यावर होणारे लैंगिक शोषण, अत्याचार या गोष्टींमुळे स्त्रियांचे, मुलींचे जीवन धोक्यात येत आहे.
आज ही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो मुलींचा तिरस्कार केला जातो महिलांचा अपमान केला जातो असा अत्याचार करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की ती महिला कोणाची तरी आई बहीण किंवा मुलगीच आहे. स्त्री पुरुष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी प्रत्येक स्त्री ही समाजात स्वतःची ओळख निर्माण करीत आहे. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. आपण अशा स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
कुटुंबातील केवळ निर्णय तिच्यावर थोपवण्या ऐवजी निर्णय घेण्यात तिला सामील करून घ्यायला हवे, स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल असे मला वाटते. कार्यक्रमाचे संचलन ग्रामविकास अधिकारी येरसनवार साहेब यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका संगेवार मॅडम यांनी मांडले.