मारतळा परिसरात चोरांचा धुमाकूळ ; उस्माननगर पोलीस ठाण्याच्या च्या हद्दीत पाच ठिकाणी जनावरांची चोरी

बालासाहेब शिंदे
मारतळा :- कंधार -लोहा तालुक्यातील शिराढोण, कापसी, हिंदोळा, गोळेगाव, उस्माननगर, वजीरगाव अश्या जवळपास 4-5 किमी च्या अंतरावरील एकाच महिन्यात या 6 गावांमध्ये जनावरांची चोरी झाली आहे.मारतळा परिसरात चोरांचा धुमाकूळ वाढला आहे मागील आठवड्यात मारतळा बाजापेठेत सलग दोनवेळा सहा ते सात दुकाने फोडून चोरी केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा चोरांची टोळी सक्रीय झाली असून आता चोरांनी त्यांचा मोर्चा जनावरे चोरण्याकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदोळा येथील शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे शेतावरील गोठ्यात बांधलेली जनावरे दि.22 एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी सोडून नेली. त्यानंतर त्यांनी उस्माननगर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला परंतु ही जनावर चोरीची मालिका काही थांबता थांबेना हिंदोळा येथील चोरट्याना पकडण्यासाठी पोलिसांची गस्त चालू असतानाच पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून त्यांनी हिंदोळा गावापासून जवळच असलेल्या शिराढोण, गोळेगाव येथून दि.5 मे रोजीच्या रात्री तीन बैल एक कारवड गोठ्यातून सोडून नेली.
तसेच उस्माननगर ता.कंधार येथील शेतकरी साखरे यांच्या शेतातील आखाड्यातील कुलुप तोडून बैलांची वेसण तोडून नेल्याचे सहा मे रोजी पहाटे साखरे यांना दिसून आल्याने त्यांच्या पाया खालची वाळूच सरकली. शेतकऱ्यांचे लाखो रुपये ची बैलजोडी चोरीस गेल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी सकाळी व सायंकाळी शेतात कामे करून जनावरे शेतात बांधत आहेत. गावातील जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी जनावरे शेतात बांधत आहेत. याचा फायदा चोरटे घेताना दिसत आहेत.
लोहा तालुक्यातील हिंदोळा येथील शेतकरी राहुल कांबळे आणि व्यंकटी जाधव यांच्या शेतातून दोन गाय, एक बैल, एक म्हैस तर शिराढोण येथील मुक्ताराम पांडागळे यांच्या शेतातून दोन बैल, कापसी येथील रुक्मिनबाई नरवाडे यांची एक लाल कंधारी गाय तर गोळेगाव येथील शिवाजी शिराळे यांची एक गाय, दोन कारवड अश्या जनावरांची चोरी झालेली असल्याची माहिती सदरील शेतकऱ्यांनी दिली.
कंधार /लोहा तालुक्यातील जनावरांच्या चोऱ्या ह्या एकाच महिण्यात 4 ते 5 ठिकाणी झाल्या असल्यामुळे आता परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हिंदोळा येथील शेतकरी राहुल कांबळे यांच्या फिर्यादी वरून उस्मानानगर पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीमंगले हे करीत आहेत. दरम्यान लागोपाठ होत असलेल्या चोऱ्या बाबत कोणीही वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची दखल घेत नसल्यामुळे मारतळा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.