ताज्या बातम्यानांदेडनायगांव

सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक झाली चुरशीची : वसंतराव कि प्रतापराव ? आज निर्णय

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नांदेड लोकसभेचा खासदार कोण होणार याची उत्कंठा लागली असली तरी सायंकाळ पर्यंत मतदारांनी कौल कुणाच्या बाजूने दिला आहे हे स्पष्ट होईल. परंतु माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्याने लोकसभेची निवडणूक एकतर्फी होईल असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होता पण नंतर ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली चिखलीकरापुढे कडवे आव्हान उभे राहील्याने अशोकरावच भाजपसाठी घाटे का सौदा होणार नाहीत ना इथपर्यंत चर्चा सुरु झाल्या. वसंतराव चव्हाणांनी निवडणुकीत मोठी रंगत आणल्याने काटे की टक्कर झाली यात जनमताच्या चर्चेनुसार वसंतराव बाजी मारतील असे बोलल्या जात आहे पण कोण विजयी होणार हे मतपेटी उघडल्यानंतर कळणार आहे.

नांदेड लोकसभेसाठी दि. २६ एप्रिल रोजी मतदान झाले. तेव्हापासून ग्रामीण भागात कौण बनेगा नांदेडका खासदार अशी चर्चा सुरू झाली. काँग्रेस आणि भाजपच्या गोटातून विजयाचे दावे करण्यात येवू लागले. तर अनेकांनी शर्यतीही लावल्या आहेत. त्यामुळे आज होत असलेल्या मतमोजणीकडे प्रत्येकाचे लक्ष लागलेले आहे. सकाळी आठ वाजतापासून मतमोजणी सुरु होणार असून ८४ टेबलवर २३ ते २६ फेऱ्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. एकूण १८ लाख ५१ हजार ८४३ मतदानापैकी ११ लाख २८ हजार ५६४ मतदान झाले. यापैकी जो उमेदवार ५ लाखाच्या वर मतदान घेईल तो नांदेडचा खासदार होणार.

नांदेड जिल्हा हा अशोकराव चव्हाण यांच्या नावानेच ओळखला जात होता आणि जिल्ह्यावर त्यांचा एकछत्री अंमल होता. विद्यमान लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे पण अशोकराव चव्हाणांच्याच नेतृत्वात काम करत होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. अशोकराव यांच्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली कारण अशोकराव म्हणजे काँग्रेस असे समिकरण झाले होते.
अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याबद्दल मतदारात कमालीचा संताप निर्माण झाला होता तो अशोकराव चव्हाणामुळे कमी होईल आणि दोन शक्ती एकत्र आल्याने भाजपचा एकतर्फी विजय होणार असल्याचे गणित मांडण्यात आले होते. सुरुवातीला तशी चर्चाही जिल्हाभर होवू लागल्याने चिखलीकर दुसऱ्यांदा खासदार होणार असल्याचे भकित व्यक्त करण्यात येत होते.

एकीकडे खासदार चिखलीकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसडून थोड्या उशीरानेच वसंतरावांच्या नावाची घोषणा झाली. मात्र उमेदवारी दाखल करतांनाच वसंतराव चव्हाणांनी मोठे शक्तीप्रदर्शन करुन भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली. त्यानंतर वसंतराव यांनी कडवे आव्हान उभ करुन काटे की टक्कर देण्यास सुरुवात केल्याने धास्तवलेल्या भाजपने जिल्ह्यात अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा बार उडवला आणि वातावरणात बदल करण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरु झाली तर दुसरीकडे अशोकराव चव्हाण यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी भावनिक आवाहनही केले पण वसंतराव चव्हाण यांचा जोर काही कमी होताना दिसून आला नाही. त्यातच पंतप्रधानांनी आपल्या प्रचार सभातून विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्य केल्याने त्या समाजात नाराजी पसरली होती. त्यामुळे मुस्लिम समाजाने भरघोस मतदान केले. त्यातच मराठा आरक्षणाचा फटकाही भाजपला बसला. विशेषतः अशोकरावांना मराठा तरुणांच्या रोषाला बळी पडावे लागले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यंदा एम आय एम चा उमेदवार नांदेडच्या मैदानात नसल्याचा फायदा काँग्रेसला त्यातच वंचितच्या उमेदवाराची जादू चालल्या नसल्याने दलित समाजानेही काँग्रेसचे पारड्यात मत टाकले. त्यामुळे काँग्रेसकडून विजयाचा दावा केला जात आहे.

भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही प्रभावी यंत्रणा राबवली कार्यकर्त्यांना कामाला लावले, कुठल्याही परिस्थितीत आपण जिंकलो पाहिजे असा कानमंत्र दिला. त्याचबरोबर अशोकराव चव्हाण यांनीही मतदारसंघ पिंजून काढला शेवटच्या दिवसात त्यांनी भोकर विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित करुन मताधिक्य मिळेल याची काळजी घेतली. भाजपकडून विजयाचे गणित मांडण्यात येत आहे. दोन्ही पक्षाच्या दाव्यानुसार हे आज सायंकाळ पर्यंत कळणार आहे कि नांदेडचा खासदार कोण होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker