रामतीर्थ येथे वीज पडून एक बैल जागीच ठार

मोरे मनोहर
किनाळा :- शंकरनगर परिसरात वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटात दि.6 जुन रोजी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या पावसात रामतीर्थ तालुका बिलोली येथील तिरुपती व्यंकटराव पाटील देगलूरे यांच्या शेतात त्यांच्याच बैलावर विज पडल्याने एक बैल जागीच ठार झाला.
शंकरनगर व परिसरातील शेतकरी शेताच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यासाठी परिश्रम घेत असताना मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतीची कामे आधुनिक यंत्राच्या साह्याने केली जात असली तरी अल्पभूधारक असलेल्या कित्येक शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना आजही पारंपारिक पद्धतीने नांगरटी ,वखरटी व पेरणी करण्यासाठी बैल जोडीच्याच माध्यमातून शेतीची कामे करावी लागतात.
पेरणीचे दिवस तोंडावर आली असल्याने प्रत्येक शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असताना रामतीर्थ तालुका बिलोली येथील शेतकरी तिरुपती व्यंकटराव पाटील देगलूरे हे आपल्या शेतात पेरणीपूर्व मशागतीचे काम करण्यासाठी बैल जोडी घेऊन शेतावर गेले असता दि.6 जुन रोजी दुपारी तीनच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट होत वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने या पावसात तिरुपती पाटील यांनी आपली बैलजोडी शेतातील गोंदणीच्या झाडाखाली बांधून शेतात बांधावर थांबले असता बैल जोडी वर वीज कोसळल्याने एका बैलाच्या जागीच मृत्यू झाला.ं
सर्वसामान्य शेतकरी शेतीच्या मशागत व पेरणीसाठी आर्थिक संकटात असताना येथील शेतकऱ्यांचा शेतीसाठी आधार असलेली बैल जोडी वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाल्याने ऐन शेताच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामात त सुमारे 80 हजार रुपये किमतीचा एक बैल मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असून या घटनेची माहिती रामतीर्थ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिल फोले आणि तलाठी विजय पाटील जाधव यांना कळविले असता रामतीर्थ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिल फोले यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरील घटनेचा रितसर पंचनामा केले.