बळेगाव रेती डेपोतून घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळेना : आँनलाईन नोंदणी करुनही ताटकळत बसावे लागत असल्याने तीव्र संताप

New Bharat Times नेटवर्क
उमरी : बळेगाव येथील शासकीय रेती डेपोतून घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळू नये अशी व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागानेच केल्याने दोन दिवसापासून लाभार्थी रेतीसाठी धावपळ करत आहेत. तर याच डेपोतून अधिकचे पैसे मोजणाऱ्यांना मात्र तत्काळ रेती उपलब्ध होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय कुणाच्या फायद्यासाठी काम करत आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शासन गोरगरीब घरकुल धारकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी असे धोरण राबवत असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाचेच अधिकारी घरकुल धारकांना मिळू नये अशी व्युहरचना केल्याने मागच्या दोन दिवसापासून लाभार्थ्यांना रेती मिळाली नाही. आँनलाईन वाळूची नोंदणी करुन दोन दिवसापासून उमरी तालुक्यातील बळेगाव डेपोत ताटकळत बसावे लागल्याने नागरिक तिव्र संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे २ हजार रुपये ब्रास रेती घेणाऱ्यासाठी पायघड्या घालण्यात आल्याने गौण खनिज विभाग डेपोधारकाच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप होत आहे.
उमरी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थाना पाच ब्राॅस मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उमरी तालुक्यातील बळेगाव येथे डेपो सुर करण्यात आला. मात्र बुधवार व गुरूवार या दोन दिवशी बळेगाव डेपो येथील रेती स्टाॅक रिलीज चालू न केल्यामुळे लाभार्थाना दोन दिवस शेतील कामे सोडून रेती वाहतूक पास काढण्यासाठी सेतू केंद्रावर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.
यात काही लाभार्थानी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागातील वरिष्ठ आधिकाऱ्यांशी संपर्क साधून आम्ही गरीब घरकुल लाभार्थी आहोत. उमरी येथील सेतु केंद्रावर रेती परवाण्यासाठी गेले दोन दिवसापासून फिरत आहोत. घरकुल धारकांना रेती देण्याची मागणी केली असता घरकुल धारकांसाठी स्टाँक रिलीज करण्यात आला नसल्याची माहिती मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले. घरकुल धारकाऐवजी जास्तीचे पैसे मोजणाऱ्यांना रेती मिळत असल्यांने घरकुल लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील इतर डेपोतून घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत असताना बळेगावच्या डेपोतून रेती दोन दिवसापासून मिळत नाही. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाचे अधिकारी म्हणतात घरकुल धारकांसाठी स्टाँक रिलीज केला आहे असे सांगितल्या जात असल्याने नेमके कोण खोटे बोलत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.