कुणाचाच आग्रह नसताना डॉ.मिनल खतगावकरांची नायगाव मतदारसंघात घुसखोरी

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : धर्माबाद तालुक्यातील संगमेश्वर येथील खतगावकर कुटूंबीयांनी आयोजित केलेल्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन डॉ. मिनल खतगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नायगाव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उतरणार असल्याचे जाहीर केले. पण निवडणूक लढवण्याची कुणाचा आग्रह होता असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. दुसरीकडे ही बंडखोरी नव्हे तर खतगावकरांचा दबावतंत्राचा भाग असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नायगाव मतदारसंघात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत असून माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या सुनबाईसाठी आपले राजकीय कसब पणाला लावले आहे. धर्माबाद तालुक्यातील संगमेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त महाप्रसादाचे आयोजन करुन सुनबाईसाच्या राजकीय प्रवासाची दिशा ठरवली.
खतगावकरांनी आपल्या मनोगतात डॉ. मिनलला विधानसभेवर जाण्यासाठी कार्यकर्त्यातून आग्रह असेल तर कार्यकर्ते व डॉ. मीनल यांच्यामध्ये मी अडथळा निर्माण करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. मिनल खतगावकर यांनीही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नायगाव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उतरणार असल्याचे जाहीर केले.
डॉ.मिनल खतगावकर यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संपर्क टिकवुन ठेवला नाही. मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत कोणत्या सामजिक किंवा सार्वजनिक हिताच्या कार्यास उपस्थित राहिले नाहीत.
मग निवडणुक लढवा म्हणून कोणत्या कार्यकर्त्यांनी विनंती केली हा प्रश्न कार्यकर्ते आपापसात बोलून दाखवत आहेत. तसेच पक्षाकडून उमेदवारी मिळो किंवा नाही पण मी निवडणुक लढविणार असल्याचे आवर्जून सांगितलें असल्यामुळे मुळात त्यांना निवडणुक लढवा म्हणून कोणत्या कार्यकर्त्यांनी विनंती केली हा मुख्य चर्चेचा विषय बनला आहे.
स्वतःच्या राजकीय स्वर्थासाठी सोईनुसार कधी काँगेस,कधी भाजप,पुन्हा काँगेस पुन्हा भाजप आणि आता वेळ पडली तर अपक्ष लढवण्याचे निर्धार करणारे ज्यांना त्यांच्या पक्षाने भरभरून दिले ते त्यांचे होऊ शकले नाहीत तर आपले काय होतील अशी भावना कार्यकरते खाजगीत बोलून दाखवत आहेत.
विशेष म्हणजे नायगाव मतदार संघातील डॉ.मिनल खतगावकर यांची घुसखोरी ही अनेकांच्या पचणी पडताना दिसत नसून आजपर्यंत नायगाव तालुक्याच्या विकासात खोडा घालणारे खतगावकर नायगाव मतदार संघाचीच निवड करुन भाजपला आडचणीत तर आणण्याचा प्रयत्न तर आहेच पण काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्राचा भाग असल्याचे उघड उघड बोलण्यात येत आहे.
नायगाव तालुका निर्मितीच्या वेळी खतगावकरांनी खोडसाळपणा केला त्याचबरोबर तहसील कार्यालय स्थापनेवरुनही त्यांनी राजकारण केले होते त्यामुळे नायगाव तालुक्यातील जनता हे आजपर्यंत विसरले नाहीत.