नरसी सोसायटी निवडणूक : भिलवंडे विरुद्ध भिलवंडे लढत

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नरसी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवाराची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर निवडून द्यावयाच्या १३ जागेसाठी २६ उमेदवार मैदानात राहिले आहेत. सोसायटीची निवडणूक साधी जरी वाटत असली तरी दोन्ही गटाने मोठ्या प्रतिष्ठेची केल्याने भिलवंडे विरुद्ध भिलवंडे असाच चुरशीचा आणि अटीतटीचा सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.
नरसी सेवा सोसायटी भाजपच्या ताब्यात होती. मुदत संपल्यामुळे पुढील पाच वर्षे म्हणजे २०३० पर्यंतसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली. सेवा सहकारी सोसायटीवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी श्रावण पाटील भिलवंडे यांनी आपलं पॅनलच्या माध्यमातून १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तर दुसरीकडे सोसायटी ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी भिलवंडे, सेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र भिलवंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भास्कर भिलवंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे , माजी उपसरपंच मोहण भिलवंडे यांनी एकत्र येऊन गावकरी विकास पॅनलच्या माध्यमातून १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत.
निवडणुक प्रकिया सुरू झाल्यानंतर एकूण ४२ जनांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता यापैकी ९ जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. काल एकूण ७ जनांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दि. ६ मार्च रोजी १३ जागेसाठी सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मतदार संघातून वडगावे मारोती नारायण, मिसे हाणमंत गंगाराम, गोड अरूणाबाई हनुमंत, कोकणे विश्वनाथ सुभाणजी, मोहम्मद रफिक इस्माईल, सुर्यवंशी आनंदा तुकाराम, ताटे संदिप साहेबराव, भिलवंडे अनुराधा दशरथ, कोकणे सुधाकर देवराव, ताटे बालासाहेब मारोतराव, साखरे अशोक बसवंतराव, मांजरमे संभाजी मसना, भिलवंडे बालाजी हनुमंतराव, कोरे बापुराव सहदेव, कुलकर्णी गोपाळराव केशवराव, भिलवंडे अनुसयाबाई बालाजी.
तर अनुसूचित जाती / जमाती मतदार संघातून नागेश्वर व्यंकटेश जळबा, सुर्यवंशी देऊबाई चांदु, इतर मागासवर्गीय संघातून पोतदार भीमराम, बोधने शंकर, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून खणपट्टे जनाजी माधवराव, बागडे पांडुरंग संभाजी तर महिला राखीव मतदार संघातून तुपेकर राजाबाई गोविंदराव, चुट्टेवाड अंजनाबाई पांडुरंग, सय्यद खातिजाबी इस्माईल, भिलवंडे ममता गजानन अदि उमेदवार असे एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या निवडणुकीत ४४० मतदार संख्या असून येणाऱ्या १६ मार्चला मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
नरसीच्या राजकारणात भिलवंडे हे नावच जिल्ह्यात दबदबा ठेवणारे होते. आणि कुठलीही निवडणूक सर्व भिलवंडे एकत्र येवूनच लढत असत. मात्र राजकीय महत्वकांक्षेमुळे भिलवंडे विखुरले गेले असून सोसायटीच्या निवडणुकीत भिलवंडेच एकदुसऱ्याच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे नरसी सोसायटीची निवडणूक भिलवंडे विरुद्ध भिलवंडे अशीच होणार आहे.