कुंडलवाडी शहरातील आठवडी बाजारातून मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ
◆ चोरट्यांना पकडण्याचे कुंडलवाडी पोलिसांसमोर आव्हान

कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरात मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाइल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत असून दर बाजारी एक ते दोन जणांचे मोबाइल लंपास केले जात आहेत. आठवडी बाजारात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत असून मोबाइल चोरांच्या मुसक्या आवळणे कुंडलवाडी पोलिसांसाठी आव्हान आहे.
कुंडलवाडी शहरात मंगळवार व शुक्रवारी असे आठवड्यातून दोन दिवस आठवडी बाजार भरतो.शहर परिसरातील पंधरा ते वीस गावातील नागरिक बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात.त्यामुळे आठवडी बाजारात नेहमीच गर्दी असते. यातच सध्या दिवाळीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे या गर्दीचा फायदा घेत बाजाराच्या दिवशी गर्दीमध्ये खिशात असलेले मोबाइल लंपास करण्याच्या प्रकार आठवडी बाजाराच्या दिवशी होत आहे.
गर्दीमध्ये भाजीपाला व साहित्य खरेदी करण्यात गुंतलेल्या नागरिकांचे लक्ष चुकवून चोरी करण्याचा प्रकार सुरू आहे. मागच्या महिनाभरात चन्नारेड्डी गोदलवार, झिया शेख, साहेबराव कोंडावार, उत्तम गायकवाड, आजिम शेख पांचे मोबाइल चोरी महागड्या किमतीचे मोबाईल चोरीला गेल्याची माहिती असून यापैकी दोन लोकांनी मोबाइल हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. दि.१ नोव्हेंबर रोजी आजिम शेख यांचा मोबाईल आठवडी बाजारात चोरीला गेला आहे.
कुंडलवाडी पोलिसांनी मोबाईल हरवल्याची तक्रार नोंद न करता चोरीची तक्रार नोंद करून तपास केल्यास मोबाईल चोरटे मिळण्याची शक्यता आहे.आठवडी बाजारात मोबाईल चोटे सक्रिय झाल्याचे या घटनेवरून दिसून येत असून कुंडलवाडी पोलिसांनी आठवडी बाजाराच्या दिवशी साध्या गणवेशात पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.