गहू व तांदळाचे १४० पोते व दोन वाहणासह २५ लाखाचा मुद्देमाल जप्त

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : ऑपरेशन प्लॅश आऊट अंतर्गत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी सुरूच असून गुरुवारी नायगांव जवळ केलेल्या कारवाईत रेशनच्या तांदळाने भरलेला संशयित आयचर ट्रक व बलोरो टेम्पो ताब्यात घेण्यात आला. यामध्ये १४० पोते तांदूळ, गहू व दोन्ही वाहनासह जवळपास २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सातत्याने सुरू असलेल्या कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याविरोधात ऑपरेशन फ्लॅश ऑऊट मोहिम राबविली जात असून. गेल्या पंधरवड्यात अवैध धंदे करणाऱ्या अनेकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. कुंटुरसह शंकरनगर, तळेगाव रोडवर नुकतेच राशनने भरलेल्या वाहने पकडल्या नंतर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आज (ता.१९) सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान नायगाव नजीक नांदेड रोडवर आयचर टेम्पोची (एम.एच.२६ बि.डी.८५१०) तपासणी केली असता गहु आणि तांदूळ प्रत्येकी ४० पोते आढळून आले.
यांची किंमत १ लाख १० हजार रूपये, तर दुसऱ्या बलोरो महिंद्रा टेम्पो (एम.एच.२६ बि.इ.४२४६) या वाहनात ६० पोते तांदूळ किंमत ७५ हजार रुपये किंमतीची धान्य दिसून आले. सदर धान्य गोरगरीब जनतेला देण्यात येणाऱ्या तांदूळ व गहु काळ्या बाजारात जात असल्याचे संशयावरून पथकाने कारवाई केली असून सदर वाहन नायगाव पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे.
दोन्ही वाहनातून १४० पोते तांदूळ, गहू व दोन्ही वाहनासह २४ लाख ८५ हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली असल्याची माहिती नायगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिजित कुंभार यांनी दिली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पथकांची या भागात कार्यवाही सुरूच असून नायगाव तालुक्यातील कुंटुर फाट्यावरील खाजगी गोदामावर पोलिस पथकाने धाड टाकून अंगणवाडीतील लहान बालकांना देण्यात येणा-यां सकस आहाराचे पाकिटे आढळून आल्याने कार्यवाही केली होती. दोन दिवसांपूर्वी शंकरनगर परीसरात एका वाहनातून राशनचा माल पकडले होते आज तिसरी कार्यवाही केली आहे.
जप्त केलेल्या गहू व तांदूळ राशनचाच आहे का याची खात्री करण्यासाठी नायगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला कळवण्यात आले असून. पुरवठा विभागाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल.
यापुर्वी कुंटूर व रामतीर्थ येथील प्रकरणात संशयित राशनच्या धान्याची वाहणे पकडून लावण्यात आली पण या दोन्ही प्रकरणात पुढे काय कारवाई झाली हे गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे होणाऱ्या कारवायाबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.