पिक पाहणी नोंदणीसाठी सात दिवसाची मुदतवाढ

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांना पिक पाहणी नोंदवता आली नाही. त्यामुळे शासनाने ई-पिक पाहणी नोंदणी करता यावी यासाठी ७ दिवसाची मुदतवाढ दिली असून आता २३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे. दि. १ आँगष्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान केवळ ४६ टक्के शेतकऱ्यांनीच पिकांची
नोंद केली होती त्यामुळे ही मुदतवाढ दिली आहे.
शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदान देण्यासाठी ई-पिक पाहणी बंधनकारक करण्यात आली होती. याला असंख्य शेतकऱ्यांनी विरोध केला होता तरीही शासनाने यात शिथिलता दिली नाही. पण ई-पिक नोंदणी करतांना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता.
कधी नेटवर्क चालत नव्हते तर कधी अँप चालत नसल्याने ई-पिक पाहणी व नोंदणी करणे डोकेदुखी ठरत होती. विशेष म्हणजे अशिक्षित शेतकरी असणे ही सर्वात मोठी अडचण ठरली आहे. त्यामुळे दिड महिण्याची मुदत दिल्यानंतरही अंदाजे ४६ टक्के शेतकऱ्यांनीच ई-पिक पाहणी करुन सातबाऱ्यावर नोंद केली आहे. राज्यात खरीप हंगाम सन २०२४-२५ हा दि. १ ऑगस्ट २०२४ पासून सुरू करण्यात आला आहे व दि.१५ सप्टेंबर २०२४ पर्यंत शेतकरी स्तरावरील पिक पाहणी करीता उपलब्ध आहे.
परंतू राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे. तसेच अद्याप याचाबत योग्य प्रचार, प्रसिद्धी न झाल्याने शेतकऱ्यामार्फत पिकांची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात नोंदवण्यात आली आहे. तदनुसार खरीप हंगाम २०२४ करीता ०७ दिवसाची दि. २३.०९.२०२४ पावेतो शेतकरी स्तरावरील पिक पाहणी नोंदविण्याची मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच सहायक / तलाठी स्तरावरील पिक पाहणी मुदत ०७ दिवसाची (दि. २४.०९.२०२४ ते दि. २३.१०.२०२४) मुदतवाढ देण्यात येत आहे.
याबाबत योग्य प्रचार, प्रसिद्धी करून शेतकऱ्यामार्फत जास्तीत जास्त पीकपेरा नोंदी करणेबाबत योग्य ते निर्देश आपले स्तरावरून देण्यात यावेत, व दिलेल्या मुदतवाढीचा वापर करून शेतकऱ्यांना स्वतः पिक पेरा नोंदवता येईल या बाचत जनजागृती साठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. असे आदेश विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना जमाबंदी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिले आहेत.