नायगाव शहरातील सात कृषी केंद्राचे खत विक्रीचे परवाने सहा महिण्यासाठी निलंबित : राजकारण्यांशी जवळीक असलेल्या व्यापाऱ्यावरही कारवाई झाल्याने खळबळ

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : खताच्या काळाबाजाराची तालुक्यातील शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्यामुळे डिसेंबर 2025 मध्ये 15 दिवसासाठी नायगाव शहरातील सात कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले होते. पुन्हा मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय चर्चेला आला होता. त्यामुळे त्याच सात कृषि सेवा केंद्रांचे खत परवाने कृषि विभागाने सहा महिन्यासाठी निलंबीत केले आहेत. विशेष म्हणजे राजकारण्यांशी जवळीक असलेल्या शहरातील अनेक नामांकित व दिग्गज व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित झाल्याने खळबळ उडाली असून. एकाच प्रकरणात दोनदा परवाने निलंबित होण्याची ही पहीलीच वेळ असावी.
नायगाव तालुक्यातील कृषि सेवा केंद्र चालक हे रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करत असल्याच्या अनेक वर्तमानपत्र बातम्या नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 दरम्यान आल्या होत्या. या बातम्यांच्या आधारे कृषि विभागाच्या भरारी पथकाने चौकशी केली होती. त्या चौकशी व तपासणीच्या आधारावर जिल्हा कृषि विभागने दि. 17 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत दशरथ कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत अग्रो सर्विस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, हनुमान कृषी सेवा केंद्र, मातोश्री ॲग्रो एजन्सी, शिवकृपा कृषी सेवा केंद्र, नायगांव अदि सात कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले होते. हाच विषय मार्च महिण्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा चर्चेचा आला आणि त्या कृषी सेवा केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी झाली.
याबाबत जिल्हा कृषी अधिक्षकाकडून अहवाल मागवण्यात आला त्यानंतर नायगाव शहरातील त्याच सात कृषी सेवा केंद्र चालकावर कठोर कारवाई करण्यात आली असून. कृषि विभागाने पुन्हा सहा महिन्यासाठी त्याच खत विक्रेत्यांचे परवाने निलंबीत केले आहेत. एकाच वेळी नायगाव शहरातील सात कृषि केंद्राचे परवाने निलंबित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नायगाव शहरातील खत विक्री करणारे कृषी सेवा केंद्र चालक पुन्हा मनमानी करुन वाढीव दराने खताची तर विक्री करतच होते पण याबाबत बातम्या देणाऱ्या काही पत्रकारांची राजकीय नेत्यासमोर मुस्कटदाबी करण्याचाही प्रयत्न करत होते. परवाना निलंबित झालेले काही कृषी सेवा केंद्र चालक हे राजकीय नेत्यांच्या मागेपुढे हिंडत तर असतातच पण चुकीवर पांघरून घालण्यासाठी राजकीय नेत्यांच्या नावाचाही वापर करतात अशा दुकानदारांचेही परवाने निलंबित झाले आहेत त्यामुळे शेतकरी समाधन व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे एकाच प्रकरणात दोन वेळा कारवाई झाल्याने वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले असून. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राजकीय नेते माझ्या खिशात आहेत अशा अविर्भावात वावरणाऱ्या त्या लफडेबाज व्यापाऱ्याराही कारवाईचा दणका बसला आहे.



