विमा प्रतिनिधी, ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक करणार संयुक्त पंचनामे : तहसीलदारांनी गावनिहाय पथके केली गठीत

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मागच्या आठ दिवसातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे व विमा कंपणीकडून सर्वेक्षण करण्यासाठी रोजी तालुकास्तरीय पिक विमा समितीची बैठक घेवून दिशा ठरवण्यात आली. यावेळी संयुक्त पंचनामे करण्याचे धोरण ठरले आहे. त्यामुळे दि.१० सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी गावनिहाय पथके गठीत केली आहेत. या पथकांचे पर्यवेक्षण अधिकारी म्हणून मंडळ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पंचनामे करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नंबरही देण्यात आला आहे. त्यामुळे त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी संपर्क करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुनील वरपडे यांनी केले आहे.

मागच्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली त्यामुळे नायगाव तालुक्यातील कापू, सोयाबीन, मुग,उडीद, ज्वारीचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर तीन मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत विमा कंपनीकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन करण्यात आले होते. पिकांचे क्षेत्र बाधित झाल्याच्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपणीकडे आजपर्यंत ३६ हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्याचबरोबर दि.२४ ते २८ जुलै दरम्यान झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या ४ हजार ३०० शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. अंदाजित ३५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना अर्थिक मदत करण्याचे शासनाचे धोरण असल्याने दि.२६ जुन रोजीच्या शासन निर्णयानुसार तालुकास्तरीय पिक विमा समितीची बैठक तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.९ सप्टेंबर रोजी पार पडली. यावेळी विमा कंपणीचे प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची उपस्थिती होती. सर्वेक्षण करतांना विमा कंपणीचे प्रतिनिधी चुकीचे प्रकार करत असल्याने यावेळी संयुक्त पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे ठरले. विमा कंपणीच्या प्रतिनिधींनी ग्रामसेवक, तलाठी किंवा कृषी सहायक सोबत असल्याशिवाय पंचनामे करुन नये अशी ताकीद देण्यात आली.

तहसीलदारांच्या उपस्थितीत पुन्हा दि. १० सप्टेंबर रोजी एक बैठक घेण्यात आली यावेळी तालुक्यातील ९० गावासाठी संयुक्त पंचनामा करण्यासाठी गावनिहाय पथके गठीत करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे गावनिहाय पंचनामा करण्यासाठी ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला असून शेतकऱ्यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुनील वरपडे यांनी केले आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश…
माहे ३१ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी व सतत पाउस पडल्याने नायगांव खै तालुक्यातील सर्व भागातील शेती पिकांचे, शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची तात्काळ दखल घेणे आवश्यक असल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची नियूक्ती करण्याबाबत संदर्भिय पत्रन्वये आदेशित केले आहे.
करीता खालील नमुद कर्मचारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांची पाहणी करुन शेतीपिकांचा व शेत जमीनीचा नुकसानीचे तसेच घरपडझड बाबत पंचनामे करुन सयुक्त अहवाल या कार्यालयास सादर करावा असे आदेश तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी दिले आहेत.