रेती घाट चालवण्यासाठी महसूलमंत्र्याच्या नावाचा वापर : बिलोली तालुक्यातील गंजगावच्या ठेकेदाराचा प्रताप

अंकुशकुमार देगावकर
बिलोली : रेती माफीया कधी काय करतील याचा नेम नसून बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील 280 या खाजगी गटातून रेती काढण्यासाठी वीरभद्र परबता कनशेटटे यांच्या नावाने परवानगी घेतली. पण अवैधरित्या रेती उपसा करण्याबरोबरच अधिकाऱ्यावर दबाव निर्माण करण्यासाठी चक्क ठेकेदार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर करत आहे. महसूल मंत्र्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करुन रेती घाट बंद करण्यात यावा अशी मागणी राहूल जिगळेकर व शंकर तमनबोईनवाड यांनी केली आहे.
रेतीच्या धंद्यात मोठ्या प्रमाणात राजकारण सुरु झाले असून नांदेड जिल्ह्यात तर रेती माफीयांना राजकीय संरक्षण मिळत असल्याने महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून बिनदिक्कतपणे रेतीचा अवैध उपसा सुरुच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकाही घाटाचा लिलाव झालेला नसतानाही गोदावरी नदीपात्रात रेती शिल्लक राहीली नाही हे विशेष. रेती माफीयांनी गोदावरी नदी पात्रातील रेती संपवून टाकल्याची एकीकडे चर्चा होत असताना बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील खाजगी गट क्रमांक 280 मधून लाल रेती काढण्याची परवानगी मिळवलेल्या ठेकेदाराने चक्क राज्याच्या महसूल मंत्र्याच्या नावाचा वापर करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बिलोली तालुक्यातील गंजगावच्या ठेकेदाराने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर अधिकाऱ्यावर व अन्य प्रशासकीय यंत्रणेवर दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राहूल जिगळेकर व अदिवासी कोळी समाज संघटनेच्या कार्यकर्ते शंकर तमनबोईनवाड यांनी या प्रकरणी आवाज उठवला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक तक्रार दिली असून महाराष्ट्र राज्याच्य महसुल मंत्री महोदयाच्या नावाने नांदेड जिल्हयातील मौजे गंजगाव रेती घाटाव हैदोस घालणाऱ्या तेलंगाना राज्यातील रेती तस्कारांवर तात्काळ सीमा बंदी करण्याची कार्यवाही करण्यासह महाराष्ट्र शासनाची व तेलंगाना शासनाची रेती चोरी करणाऱ्या महाराष्ट्रातील गट क्र.२८० व ३२५ यांच्या मूळ मालकांवर शासन नियम व अव शर्तीचे भंग केले असल्याने त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करू दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.
तसेच सदर रेती घाट चालवणारे हे तेलंगाना राज्यातील असून ते महाराष्ट्र राज्यातील महसूल मंत्री बावनकुळे यांची प्रतिमा मल्लिन करत असून सदर दिलेला घाट तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा दि. २८ मे पासून शासकीय निवासस्थानी लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षा निवास समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. यात उपोषणकर्त्यास काही बरेवाईट इ पाल्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशाराही जिगळेकर व तमनबोईनवाड यांनी दिला आहे.