कृषी पंपासाठी शेतकर्यांना सोलारपंप जोडणीची सक्ती नकोखा.रवींद्र चव्हाण यांची राज्य सरकारकडे मागणी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : शेतकर्यांनी नवीन कृषिपंपाला वीज जोडणीसाठी आवश्यक ते सोपस्कार पूर्ण केले आहेत, शिवाय पाईप लाईनसाठी लाखो रुपये सुद्धा खर्च केले आहेत. परंतु विद्युत विभागाकडून शेतकर्यांना वीज जोडणी ऐवजी सोलार पंपाची सक्ती केली जात आहे.
कृषी पंपासाठी ज्या शेतकर्यांना वीज जोडणीची गरज आहे त्या शेतकर्यांना सोलार पंपाची सक्ती करू नये, अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
खा.रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले की,नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर-2024 अखेर 3782 शेतकर्यांनी नवीन कृषिपंप विद्युत जोडणी व त्यासाठी लागणार्या पोलसाठी कोटेशन भरणा केलेले आहेत. नवीन 14344 शेतकर्यांनी कृषिपंप जोडणीसाठी संबधीत विभागाकडे कोटेशनची मागणी नोंदवीली असतांना विद्युत विभागामार्फत केवळ सोलार पंप जोडणी शिवाय कोणतीही अन्य जोडणी दिली जात नाही. शेती पंपासाठी सोलार पंप शेतकर्यांना गरजेनुसार उपयोगी पडत नाही.
सिंचन क्षेत्र अपुरे राहत आहे. डिसेंबर-2024 अखेर भरणा केलेल्या काही कोटेशनधारकांनी 2 ते 3 कि.मी. पाईप लाईन टाकून सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचा खर्च केला आहे. असे असताना विद्युत विभागा मार्फत शेतकर्यांना सोलारपंप जोडणी सक्तीची केली जात आहे.
शासनाने शेतकर्यांच्या हितासाठी नियमात धोरणात्मक बदल करणे आवश्यक असून शेतकर्यांनी विद्युत जोडणी मागीतल्यास विद्युत जोडणी द्यावी आणि सोलार पंपाची मागणी केल्यास सोलार पंप जोडणी देण्याबाबतचा निर्णय घ्यावा जेणे करून शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. शेतकर्यांच्या मागणीनुसार विद्युत जोडणी देण्याबाबत संबधीत विभागाला आदेश द्यावीत, अशी मागणी खा.रवींद्र चव्हाण यांनी या निवेदनात केली आहे.