आमदारांना वेळ मिळेना आणि पाणी टंचाईचे नियोजन होईना ; यंदा नागरिकांना करावा लागणार टंचाईचा सामना

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : फेब्रुवारी महीना संपत आला तरी पाणी टंचाई आराखड्याचे नियोजन किंवा त्यासंदर्भात बैठकच झाली नसल्याने आमदारासह पंचायत समितीला आराखड्याचा विसर तर पडला नाही ना अशी शंका येवू लागली आहे. वेळेत बैठक न झाल्यास नागरिकांना टंचाईचे चटके बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारी महीण्यात बैठक घेवून टंचाईबाबत जुन महिण्यापर्यत उपायोजनेचे नियोजन करण्यात येते.
एकीकडे अनेक ग्रामपंचायतीमधील अनागोंदी कारभाराने कळस गाठला आहे तर दुसरीकडे अर्धा फेब्रुवारी संपत आला तरी पाणी टंचाई आराखड्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. नायगाव तालुक्याला पाणी पुरवठ्याचे कोणतेही मोठे उद्भव नसल्याने आपापल्या गावातच पाणी टंचाईचे नियोजन करावे लागते. तालुक्यातील सरपंचांना पंचायत समिती स्तरावर पाणी टंचाई आराखडा नियोजन बैठक कधी होते याकडे लक्ष लागले आहे.
फेब्रुवारी महीण्याच्या सुरुवातीपासूनच चटके बसण्यास सुरुवात झाली असून लहान मोठे नदी नाल्यातील पाणी कमी होत आहे त्याचबरोबर बोअर, विहीर, तलाव, हातपंपाची पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे जनावरासह नागरिकासांठी पाण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे.
तहसील कार्यालय, पंचायत समिती व जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग यांची दरवर्षी संयुक्तरित्या विहीर अधिग्रहण करणे तसेच वाडी-तांड्यावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करणे, पाणीटंचाई संदर्भात बोर अधिग्रहण व उपाययोजना करून आराखडा तयार इत्यादी सोय केली जात होती. परंतु यंदा कसलीच सोय करण्यात येत नसल्याचे दिसते. तालुक्यातील सरपंचांनाही या बैठकीची उत्सुकता आहे. मात्र गटविकास अधिकाऱ्यांने परस्पर आराखडा तयार करुन पाठवला असल्याने नाराजी वाढली आहे.
दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारी महीण्यात सरपंच, ग्रामसेवक व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत बैठक होवून सांभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार केला जातो पण मागील दोन तीन वर्षांपासून आमदार बैठकीला वेळ देत नसल्याने ही परंपरा मोडीत काढण्यात आली त्यामुळे यंदा ही बैठकच झाली नाही. जनतेच्या अति महत्त्वाच्या प्रश्नासाठी आमदार वेळ देत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात असे दिसून येत आहे.
नायगाव तालुक्यात जलजीवन मिशनची शंकर कोटीच्या वर पाणी पुरवठा योजनेची कामेमागच्या तीन चार वर्षांपासून सुरु आहेत पण योजना पुर्ण होवून नागरिकांना घरोघरी पाणी मिळाले पाहिजे यासाठी आमदार प्रयत्न करतांना दिसत तर नाहीतच पण रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेबद्दल चकार शब्द काढत नसल्याने वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात येत आहेत.