ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

उद्या 21 वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन नांदेड मध्ये रंगणार

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा तालुका उमरी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे या वर्षीचे 21 वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन स्वर्गीय गंगाधरराव पंपाटराव उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव रोड नांदेड येथे उद्या रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी पार पडणार आहे अशी माहिती मुख्य संयोजक दिगंबर कदम आणि स्वागताध्यक्ष गजानन पाम्पटवार यांनी दिली आहे.

साहित्य संमेलनाचे उद्घाटन विधान परिषदेचे गटनेते ना.हेमंत पाटील यांचे हस्ते करण्यात येणार असून संमेलनाचे अध्यक्षपदी कवी कथाकार समीक्षक प्रा.रविचंद्र हडसनकर असणार आहेत.
शेट किशनजी पाम्पटवार साहित्य नगरी येथे पार पडणाऱ्या साहित्य संमेलनाची सुरुवात सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी व शोभायात्रेने करण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता संतोष तळेगावे यांच्या साहित्यातील माणिक मोती चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल. सकाळी 11 वाजता पद्मश्री नारायण सुर्वे व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल.

यावेळी आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य देविदास फुलारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांची विशेष उपस्थिती राहणार असून माजी उपमहापौर आनंद चव्हाण, गोदावरी अर्बनचे अध्यक्ष सौ राजश्रीताई हेमंत पाटील, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष एडवोकेट बी.आर.भोसले, पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, प्रसिद्ध उद्योजक मारोती कवळे गुरुजी.

शिक्षणाधिकारी माधवराव सलगर, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य संजीव कुलकर्णी, शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे, विलास ढवळे, सदाशिवराव धर्माधिकारी, पुरुषोत्तम सदाफुले, माधवराव नलबलवार, गोविंदराव सिंधीकर, बालाजी कामाजी पवार, मराठवाडा साहित्य परिषद शाखा चे नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, एडवोकेट मनीष खांडेल यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थित राहणार आहे.

लोकसंवाद साहित्य संमेलनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचेही मान्यवरांच्या हस्ते यावेळी वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता अनुपमा बन लिखित एकपात्री प्रयोग नाते हे अतूट सादर होईल. दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी सुप्रसिद्ध कवी लेखक समीक्षक डॉक्टर पी विठ्ठल यांची ऋषिकेश देशमुख यांनी घेतलेली प्रकट मुलाखत होईल. दुपारी तीन वाजता स्वाती कान्हेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कथाकथनात प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील, डॉक्टर शिवकुमार पवार, नारायण शिंदे, राम तरटे, वीरभद्र मिरेवाड हे आपल्या कथा सादर करतील. सायंकाळी साडेचार वाजता योगीराज माने यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगणार आहे.

आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनास साहित्यप्रेमी, साहित्यिकांनी आणि रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागत अध्यक्ष गजानन पाम्पटवार आणि संयोजक दिगंबर पाटील कदम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker