नायगाव पोलीस ठाणे बनले प्रयोगशाळा : दोन वर्षात दहा ठाणेदार आले आणि गेले

प्रकाश महिपाळे
नायगाव : नायगाव पोलीस ठाणे वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी एक प्रयोगशाळा ठरली असून. मागच्या दोन वर्षात तब्बल दहा पोलीस अधिकारी आले आणि गेले आहेत. वर्ष दोन वर्ष ठाणे सांभाळण्यासाठी आजपर्यंत सक्षम अधिकारी मिळाला नसल्याने ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचे काम सांभाळण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर आली आहे.
नायगाव पोलीस ठाण्यात मागच्या दोन वर्षापासून अधिकाऱ्यांचा खेळ सुरु असून वरिष्ठ अधिकारी या ठाण्याला स्थैर्य मिळण्यासाठी सक्षम अधिकारी देण्यात अपयशी ठरले आहेत. नियुक्त्यामधील घोळामुळे नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांची बदली झाल्यानंतर आजपर्यंत सहा महिने किंवा एक वर्ष एकही अधिकारी येथे टिकला नाही. अधिकारी टिकत नसल्याने ठाण्यातील कर्मचाऱ्यावर ताण येत असून कठीण प्रसंग ओढवल्यास निर्णय घेण्याबाबत पेचप्रसंग उद्भवत आहे.
नायगाव पोलीस ठाण्याबाबत वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने मागच्या दोन वर्षात तब्बल दहा अधिकारी आले आणि गेले आहेत. यात जयप्रकाश गुट्टे यांची बदली झाल्यानंतर राजू वाटाणे हे पोलीस निरीक्षक म्हणून रूजू झाले मात्र त्यांनी आठ दिवसातच पळ काढला, नंतर वसुंधरा बोरगावकर यांनीही महिनाभरात कारभार सोडला त्यामुळे पुन्हा गुट्टे यांना पदभार द्यावा लागला. गुट्टे यांनी बदली करुन घेतल्यानंतर ओमकांत चिंचोलकर हे आले त्यांची कारकीर्द अल्पच ठरली. चिंचोलकर यांनी ठाण्याचा कारभार सुधारण्याबरोबरच शहरात शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.
चिंचोलकर यांनी लोहा पोलीस ठाणे घेतल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार यांना येथे पाठवण्यात आले. पवार पंधरा दिवसच राहीलेले असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेले मोगल यांची नायगावला बदली झाली. मोगल हे कधी आले आणि गेले हे समजलेच नसताना मारोती मुंडे यांनी ठाण्याचा कारभार घेतला. मुंडे यांनी तीन ते चार महिण्यातच देगलूर ठाणे गाठले त्यानंतर अजित कुंभार हे रूजू झाले. पण ३ सप्टेंबर २०२४ रोजी रूजू झालेल्या कुंभार यांची २३ व्या दिवशी भोकरला बदली झाली तर भोकरचे सुभाषचंद्र मरकड यांना नायगावला पाठवण्यात आले.
नायगाव पोलीस ठाणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी प्रयोगशाळा झाली असली तरी या प्रकारामुळे येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर ताण पडत असून त्यांचे खच्चीकरण होत आहे.