दारु पितांना धक्का लागल्याच्या कारणावरून दोघावर चाकू हल्ला : नरसी येथील घटना

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : दारू पिताना धक्का लागल्याच्या कारणावरून नरसी चौकात दोघावर चाकू हल्ला केल्याची घटना दि. 25रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली. हल्ला करुन पळ काढणाऱ्या दोघांना नागरिकांनी चोप देवून रामतीर्थ पोलीसांच्या हवाली केले तर एका मुख्य आरोपीसह अनेकजन पळून गेले आहेत. सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नरसी येथील बिलोली रोडवर असलेल्या एका मंगल कार्यालयात रविवारी रोजी लग्न होते. लग्नासाठी बळीरामपूर नांदेड येथील काही वह्राडी आले होते. लग्नानंतर काही तरुणांनी नरसी चौकातील एका बारमध्ये दारु पित असता सिगारेट घेण्याच्या आणि धक्का लागल्याच्या कारणावरून अगोदर वादावादी व नंतर नरसी येथील ज्ञानेश्वर भानूदास बट्टेवाड, संतोष ऊलगुलवाड यांच्यावर बळीरामपूर नांदेड येथील गुंड प्रवृत्तीच्या टारगट तरुणांनी बेल्टने व चाकूने हल्ला केला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
हाणामारी होत असताना काही नागरिकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना दारुच्या नशेत असलेल्या आरोपींनी शिविगाळ करत होते. त्यामुळे नागरिकांनी यावेळी दारुच्या नशेत असलेल्या हल्लेखोरांना चांगलाच चोप दिला. नागरिकांनी मनसोक्त धुलाई करत असल्याने आपले काही खरे नाही म्हणत या घटनेतील मुख आरोपीसह अन्य काही जनांनी घटनास्थळ पळ काढला मात्र नागरिकांनी रोहन सुरेश घुळे, बळीरामपूर, अदित्य राजू वाघमारे यास पकडून रामतीर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची रामतीर्थ पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली असून जखमी झालेले बट्टेवाड व ऊलगुलवाड हे रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील अन्य आरोपींची नावे ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सांगितली असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. मागच्या काही महिण्यापासून नरसी चौक हा संवेदनशील बनत असून रामतीर्थ पोलिसांनी याबाबत कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.