बिजूर येथे सहकार मंत्र्यांच्या शुभहस्ते इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेचा शुभारंभ

मोरे मनोहर
किनाळा :- वैद्यकीय क्षेत्रातील विविध वैद्यकीय मंडळी एकत्र येऊन नव्याने शंकरनगर परिसरात बिजूर तालुका बिलोली येथे इंग्रजी माध्यमांच्या शिवनेरी पोतदार स्कूलची राजकीय मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 8 जून रोजी राज्याचे
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा शुभारंभ अनेक राजकीय मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
याप्रसंगी सहकार मंत्री आपले मनोगत व्यक्त करताना आपण सर्व जिल्हा परिषद शाळेत शिकलेली मंडळी आहोत परंतु आजच्या काळात गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही असे सांगून बिजूर तालुका बिलोली येथे वैद्यकीय क्षेत्रातील विविध वैद्यकीय मंडळी एकत्र येऊन इंग्रजी माध्यमांची शाळा सुरुवात करत आहेत याच शाळेत आपण आपले पाले पाठवावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली यामुळे या शाळेला बालाजी पाटील खतगावकर कमी पडणार नाहीत आणि ते कुठे कमी पडले तर मी तुमच्या मदतीला आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी संचालक मंडळांना आपल्या मनोगतात दिले.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, राज्यसभेचे खासदार डॉ. श्री.अजित गोपछेडे साहेब, माजी आमदार हाणमतराव पाटील बेटमोगरेकर, श्रावण पाटील भिलवंडे, माणिकराव लोहगावे, भास्कर पाटील भिलवंडे, उपजिल्हाधिकारी अधिकारी क्रांती डोंबे, बिलोली चे तहसीलदार गजानन शिंदे, मंडळ अधिकारी कल्पना मुडंकर, हे उपस्थित होते.
तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, मा.श्री प्रतापराव पाटील चिखलीकर विधानसभा सदस्य लोहा कंधार, माजी आमदार श्री संजय बनसोडे, मा.जितेश अंतापूरकर विधानसभा सदस्य देगलूर बिलोली, आमदार राजेश पवार विधानसभा नायगाव उमरी धर्माबाद, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आधीने मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवले.
उपस्थित व्यासपीठावर दोन खासदार व कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित असताना कार्यक्रमाचे उद्घाटक बाबासाहेब यांचे विचार मांडताच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने दोन्ही खासदार व कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवरांना आपले विचार व्यक्त न करताच या कार्यक्रमाचा समारोप झाला यामुळे शाळेच्या पहिल्याच शुभारंभ कार्यक्रमास अनेकांची तारांबळ उडाली. तर शाळेच्या व्यवस्थापन मंडळाच्या निष्क्रिय पणामुळे अनेकांना कार्यक्रमासाठी दिवसभर ताटकळत बसावे लागल्याने शाळेचा असाच कारभार राहिला तर या शाळेत विद्यार्थी घडतील का अशी चिंता अनेक पालकांना भेडसावत होती.