राहेरच्या पुलावरून पाणी : खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद

प्रकाश महिपाळे
नायगाव : गोदावरी नदीत पाण्याचा मोठा विसर्ग वाढला आहे त्यामुळे नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे नदी पात्राच्या आजुबाजुला असलेल्या शेतात पाणीच पाणी तर झालच आहे पण नायगाव तालुक्यातील राहेर येथील पुलावरून पाणी जात असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गुरुवारी आलेल्या महापुराने नायगाव तालुक्यात हाहाकार माजवला शेती बरोबरच घरादारात पाणीच पाणी झाल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. हा पुर ओसरतो न ओसरतो तेच गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. गोदावरी नदी नायगाव तालुक्यातील बरबडा, मेळगाव, सांगवी हुस्सा, राहेर भागातून वाहते. शुक्रवारी सकाळी नांदेड शहर व परिसरात झालेल्या जोरधारेमुळे पुन्हा पाण्याची पातळी वाढली आहे.

वाढलेले गोदावरी नदीचे पाणी राहेर येथील पुलावरून जात आहे. त्याचबरोबर रात्रीला पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोहगाव ते कारेगाव कडे जाण्यासाठी महत्वाचा असलेल्या राहेरच्या पुलावरून खबरदारीचा उपाय वाहतूक बंद केली आहे. जीव धोक्यात घालून पाण्यातून कुणीही जावू नये यासाठी कुंटूर पोलीचे बीट जमादार निकम, स्वामी, होमगार्ड शिंदे, रेनेवाड, महसूलचे तलाठी डाकेवाड, ग्रामपंचायत अधिकारी कोंडावर सह यंत्रणा तळ ठोकून बसली आहे.



