कहाळ्याच्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे !
१५ व्या वित्त आयोगात गैरव्यवहार ; महिला ग्रामसभा घेतल्याच नाहीत…

New Bharat Times नेटवर्क
नायगांव : – तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची असलेल्या कहाळा (खु.) ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगातील कामांत भ्रष्टाचार झाल्याने संबंधित सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे साकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून घालण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, कहाळा (खु.) ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी १५ व्या वित्त आयोगातील पाणी पुरवठा, स्वच्छता, शाळा व अंगणवाडी विषयक कामे कागदोपत्रीच पूर्ण दाखवून मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून ग्रामपंचायतीत वेळेत मासीक सभा घेतल्या जात नाहीत व दि.१ जानेवारी २०२१ पासून आजतागायत एकही महिला ग्रामसभाच घेतली नसल्याने याबाबत चौकशीसह संबंधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून देविदास हेंडगे यांनी केली आहे.
महत्वपूर्ण बाब म्हणजे, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा,मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मेघना कावली या कर्तव्यतत्पर महिला अधिकारी कार्यरत असल्याने त्यांच्याकडून कहाळा (खु.) या ग्रामपंचायतीत स्थानिक महिलांच्या न्याय व हक्कासह त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नियमानुसार महिलांची ग्रामसभाच घेतल्या नसल्याने दोषींविरुद्ध काय कारवाई करतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.



