आठ दिवसानंतर अवैध वाळू उपसा व वाहतूक पुन्हा सुरू : पोलीस आणि महसूल विभागाच्या भुमिकेवरच संशय

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या कारवाईमुळे आठ दिवस बंद असलेली अवैध वाळू वाहतूक सोमवार पासून दिवस रात्र सुरु झाली आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांनी कारवाईची केलेली उठाठेव वाढीव हप्त्यासाठीच तर नव्हती ना अशी शंका ग्रामीण भागातून व्यक्त केल्या जात आहे.
जिल्ह्यात कुठल्याच वाळू घाटाचा लिलाव झालेला नसताना नायगाव तालुक्यात रोजरोसपणे गोदावरी नदीटात्रातून चोरी केलेल्या वाळूची दिवसरात्र बिनदिक्कतपणे अवैध वाहतूक होते होती. तर नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरातून गोदावरी नदीपात्रात रात्रीच्या वेळी बोटीच्या सहाय्याने वाळूचा अवैध उपसा करुन विक्री करण्यात येत होती. विस दिवसापूर्वी महसूल विभागाने तीन हायवा पकडून गुन्हे नोंदवले होता.
तर आठ दहा दिवसापूर्वी तहसीलदार सौ.धम्मप्रिया गायकवाड यांच्यासह उमरी तहसीलदारांनी मोहीम राबवून बरबडा भागात दोन बोटी स्फोटकाच्या सहाय्याने उध्वस्त केल्या होत्या तर बिलोलीचे उपविभागीय अधिकारी अधिकारी शाम पानेगावकर यांनी कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतरगाव रोडवर व नायगाव येथे दि. 8 नोव्हेंबर रोजी दोन हायवा पकडून नायगाव व कुंटूर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवले होते. या कारवाईमुळे नायगाव तालुक्यातील अवैध वाळू व वाहतुकीला चांगलाच पायबंद बसला होता.
या दोन तीन कारवाईनंतर माफीयावर अंकुश बसेल असे वाटत असतांनाच सोमवार पासून पुन्हा जोमाने वाळूचा अवैध उपसा व चोरी केलेल्या वाळूची बिनधास्तपणे वाहतूक नायगाव तालुक्यात सुरु झाली आहे. रविवारी रात्री व सोमवारी सकाळपासूनच वाळूची अवैध वाहतूक सुरु झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. कारण धडाकेबाज कारवाईमुळे आठ दिवसापासून अवैध उपसा व वाहतूक बंद होती पण सोमवारी सकाळपासून सुरु झाल्याने कारवाईची उठाठेव कशासाठी होती याची चर्चा जोर धरत आहे. एकंदरीत पोलीस आणि महसूल विभागाच्या भुमिकेवरच संशय निर्माण झाला आहे.
नायगाव, रामतीर्थ व कुंटूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्याकडून वसुलीसाठी ठाण्याचे विशिष्ठ कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत एकाही हायवाच्या विरोधात गुन्हा नोंदवला नाही. महसूल विभागाने केलेल्या कारवाई प्रकरणात गुने नोंदवण्यासाठी सुध्दा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षकांची यंत्रणा कितीही कारवाया केल्या तरी नायगाव, रामतीर्थ व कुंटूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी या हायवावाल्याकडून हप्ते जमा करण्यातच धन्यता मानत आहेत.
पानेगावकर यांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात…
बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शाम पानेगावकर यांनी दि. 6 नोव्हेंबर रोजी रातोळी येथील जुगार अड्यावर कारवाई करुन 29 जुगाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली पण यात ज्या जागेत जुगार सुरु होता त्याच्यावर व जो कोणी जुगार अड्डा चालवत होता त्यांना मोकाट सोडले होते. त्याचबरोबर जप्त रक्कमेबद्दलही संशय व्यक्त करण्यात येत होता तसाच अवैध वाळूच्या केलेल्या दोन केसेस आणि पुन्हा आठ दिवसानंतर बिनदिक्कतपणे सुरु झालेली अवैध वाळू वाहतूक बरच काही सांगून जाते.



