“शेती, शेतकरी आणि नव्या पिढीच्या भवितव्यासाठी साहित्याची भूमिका महत्त्वाची” — प्रा.महेश मोरे

भगवान शेवाळे
बरबडा : मानवी मूल्यांचा ऱ्हास, शेतकऱ्यांची वाढती असुरक्षितता, पाणी, जमीन, बाजार या मूलभूत प्रश्नांची गुंतागुंत आणि नव्या पिढीसमोरील दिशाहीनता याकडे लक्ष वेधत साहित्य हे केवळ सौंदर्याचे साधन नसून सामाजिक जबाबदारी पार पाडणारे प्रभावी माध्यम आहे. शिवारात उमटणाऱ्या वेदना, कष्टकरी माणसांचे प्रश्न आणि उद्याच्या पिढीचे भवितव्य यांना साहित्याने समजून घेतले पाहिजे, त्यामुळे शेती, शेतकरी आणि नव्या पिढीच्या भवितव्यासाठी साहित्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असा स्पष्ट संदेश संमेलन अध्यक्ष प्रा.महेश मोरे यांनी दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणातून समाजातील ज्वलंत वास्तवावर त्यांनी भाष्य केले.

बरबडा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गोविंदराव धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ सोमवार दिनांक १९ रोजी आयोजित आठव्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी उद्घाटक शिक्षणाधिकारी माधवराव सलगर, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोड, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, शंकर वाडेवाले, दिगंबर कदम, आप्पासाहेब खोत, ज्योतीराम फडतरे, दत्ता डांगे, प्रा.आत्माराम राजेगोरे, गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील, मुकुंद बोकारे, पंडित ढगे, अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, स्वागताध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी, माजी प्रा.व्यंकटी सुरेवाड, शिवाजीराव धर्माधिकारी, सौ. छायाताई धर्माधिकारी, इरना कंडापले यांच्यासह अनेक साहित्यिक,कवी, व ज्येष्ठ मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी सकाळी ग्रंथदिडीने या साहित्य संमेलनाची सुरुवात झाली.गावातून मुख्य रस्त्याने निघालेली ही दिंडी आकर्षक ठरत होती. या ग्रंथदिंडीदरम्यान संत, महामानव आणि थोर विचारवंतांच्या वेशभूषेने संपूर्ण दिंडी अधिकच अर्थपूर्ण ठरली. बाळकृष्ण, संत तुकाराम, खंडोबा–बानू यांच्यासह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशात सजलेले बाळ गोपाळ विशेष आकर्षण ठरले.

या वेशभूषांमधून संस्कार, समता, भक्ती आणि समाजप्रबोधनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. चिमुकल्यांच्या निरागस रूपात साकारलेले हे थोर विचार अनेकांच्या नजरा खिळवून ठेवणारे ठरले. त्यानंतर संमेलनाचं उद्घाटन पार पाडले.यावेळी शाळेतील सांस्कृतिक विभागाचे शिक्षक नागोराव तीप्पलवाड आणि संतोष पचलिंग यांनी देशभक्तीपर गीते गायली.

प्रास्ताविक करताना संस्थेचे मुख्याध्यापक सुदर्शन धर्माधिकारी यांनी आमच्या पूर्वजांनी सुरू केलेला सामाजिक सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा हा माझ्या पिढीपर्यंत कायम चालू आहे. हा ज्ञानाच्या प्रबोधनाचा यज्ञ व्याख्यान, प्रवचन, प्रबोधन व साहित्याच्या माध्यमातून असाच पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची भावना व्यक्त केली.

पुढे बोलताना संमेलनाध्यक्ष प्रा.महेश मोरे यांनी साहित्य हे केवळ भावनिक अभिव्यक्ती नसून समाजबदलाचे प्रभावी साधन असल्याचे ठामपणे मांडले. यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी शेती, शेतकरी आणि मानवी मूल्ये होती. “मानवता धर्म टिकवायचा असेल, तर सर्वधर्मसमभाव आणि माणुसकी जपली पाहिजे,” असे सांगत त्यांनी साहित्यिकांनी समाजातील अस्वस्थ वास्तवाकडे डोळेझाक करू नये, असे स्पष्ट केले. शेती क्षेत्रातील विदारक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी पाणीटंचाई, बाजारभाव, कर्जबाजारीपणा, जमिनींचे तुकडे, महामार्ग प्रकल्पांमुळे होणारे विस्थापन, कीड-रोगांचा प्रादुर्भाव यांचा सविस्तर उल्लेख केला.

“शेतकऱ्याच्या हातात जमीन असूनही तो भूमिहीन होत चालला आहे, ही गंभीर शोकांतिका आहे,” असे परखड मत त्यांनी मांडले. शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना त्यांनी अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित केला. “दररोज दहा शेतकरी आत्महत्या करतात, हे केवळ आकडे नाहीत; ती माणसं आहेत, कुटुंबं आहेत,” असे सांगत त्यांनी सरकारी मदत अपुरी ठरत असल्याचे वास्तव मांडले. नव्या पिढीबाबत बोलताना अध्यक्ष म्हणाले की, आजची पिढी अतिशय बुद्धिमान, संवेदनशील आणि गतिमान आहे. योग्य दिशा, समजून घेणारे मार्गदर्शन आणि जबाबदार समाज मिळाला, तर ही पिढी सकारात्मक परिवर्तन घडवू शकते.
“फक्त टीका नव्हे, तर संवाद आणि समजूतदारपणा गरजेचा आहे,” असे त्यांनी नमूद केले. साहित्यिकांच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “साहित्य हे केवळ रंगीत शब्दांची मांडणी नसून, शिवारातल्या वेदना, श्रमिकांचे अश्रू आणि समाजातील विसंगती व्यक्त करण्याचे माध्यम आहे. कविता कागदावरच थांबू नये, ती वास्तवाशी भिडली पाहिजे.” असेही त्यांनी स्पष्ट केले. दुपारच्या सत्रात कथाकथन आणि कवी संमेलन देखील उत्साहात पार पडले. कथाकथन सूत्रसंचालन प्रा.पंढरीनाथ मुदखेडे, तर आभार साहित्यिक प्रा.व्यंकटेश सोळंके यांनी मांडले. यावेळी अनेक कवी आणि कथाकार उपस्थित होते.
दरम्यान, हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुदर्शन धर्माधिकारी, उपमुख्याध्यापक गणेश बडूरे, पर्यवेक्षक सूर्यकांत फड, जुनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा.तुकाराम तगडपलेवार, माजी मुख्याध्यापक प्रा.वसंत शिंदे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, जुनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक वृद, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. तर संपूर्ण साहित्य संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन नागोराव तीप्पलवाड यांनी केले.



