रामतीर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबेचे आव्हान

मोरे मनोहर
किनाळा :- महसूल मंडळ रामतीर्थ यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरचा पहिला टप्पा’ दिनांक १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता रामतीर्थ येथे आयोजित करण्यात आला असून रामतीर्थ मंडळातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे,मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर, तलाठी विजय पाटील जाधव यांनी केले आहे.
“महसूल आपल्या दारी ही केवळ घोषणा नसून आमची बांधिलकी असल्याने रामतीर्थ मंडळातील रामतीर्थ, हिप्परगा माळ, किनाळा, कामरसपल्ली, चिटमोगरा, अटकळी, टाकळी खुर्द, डोणगाव बु., पाचपिंपळी, रामपूर, केरूर, बिजूर, डोणगाव खुर्द या परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, नागरिक व गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच महिलांचे विविध प्रश्न त्वरित सोडविणे आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यभर मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या संदर्भात महसूल मंत्री यांनी विधानपरिषदेत माहिती देताना सांगितले की, जिल्हा वार्षिक योजनेतील “गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या घटकांतर्गत मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येत असून त्याचे नामकरण ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ असे करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २५ मार्च २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर वर्षातून किमान चार वेळा हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांना रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड संबंधित कामे, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ७/१२ उतारे वाटप, प्रलंबित फेरफार नोंदींचे निपटारा आणि विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रामतीर्थ महसूल मंडळातील सर्व नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून आपल्या महसूल विषयक अडचणींचे त्वरित निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महसूल मंडळाच्या वतीने बिलोली येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर, तलाठी विजय पाटील जाधव यांनी केले आहे.



