बंद पडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांना तातडीने निधी द्या : वसंत सुगावे यांची पाणीपुरवठा मंत्र्याकडे मागणी

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नांदेड जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठ्याची कामे निधीअभावी गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे गावागावातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली असून नागरिकांचे हाल होत आहेत. ही कामे तातडीने सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली होती. कंत्राटदारांनी सुरुवातीला कामे हाती घेतली, परंतु बिले न मिळाल्याने कामे बंद ठेवली आहेत. त्यामुळे गावांतील रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्याची कामे अर्धवट राहिली आहेत. रस्ते खड्डेमय झाल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. गावपातळीवरील लोकप्रतिनिधींनी कंत्राटदार आणि पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला असता “निधी उपलब्ध नाही, त्यामुळे कामे बंद आहेत” असे उत्तर मिळत आहे.
वसंत सुगावे पाटील यांनी म्हटले आहे की, निधीअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठ्याच्या कामांना तात्काळ निधी देऊन ही कामे पूर्ण करावीत. त्यामुळे गावागावातील कोलमडलेली पाणीपुरवठा योजना सुरळीत होऊ शकेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. कामे बंद असल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती आहे. फोडले रस्ते तसेच राहिल्याने पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय वाढण्याची शक्यता आहे.



