बौद्ध समाजातील महिलांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य; लक्ष्मण ढोबळेंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी १३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चादरम्यान बौद्ध समाजातील महिला व मुलींविषयी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी कथित लैंगिक व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माजी नगरसेविका अंजलीताई सुरेश गायकवाड यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून लक्ष्मण ढोबळे यांच्यासह मंचावर उपस्थित सचिन साठे, प्रा.सुकुमार कांबळे आणि अजिंक्य चांदणे यांच्याविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, कथित वक्तव्यामुळे कार्यक्रमातील महिला व मुलींना मानसिक त्रास, अपमान, भीती आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागला. तसेच कार्यक्रमस्थळी काही व्यक्तींनी बौद्ध समाजातील महिलांविषयी जातीय स्वरूपाची शिवीगाळ केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या व्यक्तींची ओळख कार्यक्रमाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे पटवून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत लक्ष्मण ढोबळे यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कथित वक्तव्यादरम्यान टाळ्या, शिट्या किंवा अन्य प्रतिक्रियांद्वारे कोणाकडून प्रोत्साहन देण्यात आले का, याचीही तपासणी करावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संपूर्ण भाषणाचा शब्दशः प्रतिलेख तयार करून आयोजक, माध्यमे आणि इतर व्यक्तींकडे उपलब्ध असलेल्या मूळ रेकॉर्डिंगचीही तपासणी करावी, अशी विनंती तक्रारीत करण्यात आली आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तपासादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेला किंवा सार्वजनिक शांततेला धोका असल्याचे निष्पन्न झाल्यास BNSS अंतर्गत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीचा उद्देशकोणत्याही समाजाविरुद्ध द्वेष निर्माण करणे किंवा तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरविणे हा नसल्याचे तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे. कायदेशीर नोंद घेऊन निष्पक्ष तपास न झाल्यास संविधानिक व कायदेशीर चौकटीत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा विचार असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका अंजलीताई सुरेश गायकवाड, अॅड. के. टी.चावरे, प्रा. देविदास मनोहरे, के. डी. कवडे, नंदू बनसोडे, पद्माकर सोनकांबळे, बबीताताई पोटफोडे, विमलताई पंडित, विमलताई कीर्तने, लक्ष्मीबाई गायकवाड, सुजाता कांबळे, शशिकला थोरात, सविता मांजरमकर आदी उपस्थित होते.
व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी…
तक्रारदारांकडे उपलब्ध असलेली भाषणाची मूळ व्हिडिओ फाइल पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची हॅश व्हॅल्यू तयार करावी, चेन ऑफ कस्टडी कायम ठेवावी आणि ऑडिओ-व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचे एडिटिंग किंवा फेरफार झाला आहे का, याचीही पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.



