नरसी चौकातील दिड तासाच्या वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल : रामतीर्थ पोलीसांच्या ढिसाळपणामुळे मनस्ताप
प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : तालुक्यातील नरसी चौकात रविवारी सकाळी ११ ते १२.३० वाजेपर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. अडकलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी कर्तव्यावर नव्हता. विविध वाहणात व बसमध्ये अडकून पडलेल्या चिमुकल्यासह अबालवृद्धांचे हाल झाले तर लग्नासाठी निघालेल्यांची उकाड्याने आणि उन्हाच्या चटक्याने प्रचंड गैरसोय झाली. लवकर वाहतूक सुरळीत होत नसल्याने चौकात अडकलेल्या प्रवाशांनी मुक्तकंठाने पोलीसांच्या कुळाचा उध्दार करुन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
रामतीर्थ पोलीस ठाण्याचा कारभार तसा नरसीच्या चौकीतूनच चालतो ठाणेदार रामतीर्थचे असलेले तरी सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप हे नरसीलाच मुक्कामी असतात. पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली असताना चौकात दिसले नाहीत. अनेक पत्रकारांनी या वाहतूक कोंडीबाबत फोन करुन माहिती दिली असता माझे तीन कर्मचारी आहेत असे सांगत होते पण एकही कर्मचारी नव्हता. नागरिकच वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसले. त्यांनाही शक्य झाले नसल्याने नरसीचे शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे व त्यांचे मित्र रस्त्यावर उतरुन दिड तासानंतर वाहतूक सुरळीत केली.
रविवारी सर्वात मोठी लग्नाची तिथे असल्याने लग्नाला जाण्यासाठी सकाळपासूनच घाई होती. नागरिक स्वतःच्या वाहणासह मिळेल त्या वाहणाने आपापल्या नातेवाईकांच्या लग्नाला निघाले पण नरसी चौकात सकाळी ११ वाजताच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली. पाहता पाहता नायगाव, मुखेड, बिलोली व देगलूर रोडवर तब्बल एक कि. मी. वाहणांच्या रांगा लागल्या. नरसी चौकात आडव्या उभ्या वाहणाने कोंडी केली होती पण ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याचा एकही अधिकारी नरसीच्या चौकात नव्हता.
वास्तविक रविवारी मोठी लग्नतिथी असल्याने नरसी चौकातून प्रचंड वाहतूक असते त्यासाठी बंदोबस्त ठेवणे आवश्यक असताना तो न ठेवल्याने वाहतुकीची कोंडी दिड तासानंतर सुटली. एकिकडे नातेवाईकांच्या लग्नाला निघाले नागरिक वाहतूक कोंडी सुटण्यासाठी प्रयत्न करत होते तर कोंडीत अडकलेल्या बसेस व विविध वाहणात प्रवासी होते. परंतु उन्हाच्या चटक्याने बससह विविध वाहणात बसलेल्या प्रवाश्यांची उन्हाच्या चटक्याने तगमग झालेली दिसून आली.अनेक प्रवासी वाहणातून उतरुन सावली शोधत होते.
रामतीर्थ पोलीसांचे बेफिकीर वागणे आणि ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास झाला. अनेकजन वेळेवर लग्नाला पोहचू शकले नाहीत. वाहतूक कोंडीतून लवकर सुटका होत नसल्याने शेकडो नागरिक नरसी चौकात येवून पोलीस चौकीत कोण आहे का हे बसघत होते आणि पोलीसांच्या कुळाचा उद्धार करुन आपल्या संतप्त भावना व्यक्त करतांना दिसले.