बारुळ मनार धरणाचे दरवाजे उघडल्याने नायगाव देगलूर रस्ता तीसऱ्यांदा बंद

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : बारूळ धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मन्याड नदीला पूर येऊन महामार्गावरील टाकळी – अटकळी रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने देगलूर -नांदेड रस्ता शनिवारी दुपारनंतर बंद केला आहे. एकाच महिन्यात उपरोक्त रस्ता तीनदा बंद करावा लागला असून. रामतीर्थ पोलिसांनी हैदराबाद जाणारी वाहतूक नरसी बिलोली मार्गे वळवली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने सर्वत्रच धुमाकूळ माजविला आहे. शेतातील होते नव्हते पिकांची संपूर्णतः नासाडी होऊन उध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यावर जणू काय आभाळ कोपला की काय असे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः खचून जाऊन हतबल झाला आहे.
अशातच शनिवारी सकाळी बारूळ धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने वझरग्याच्या मन्याड नदीला पूर येऊन नायगाव देगलूर महामार्गावर टाकळी – अटकळी रस्त्यावरून पाच ते सहा फूट पाणी वाहू लागल्याने शनिवारी दुपारनंतर पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे या मार्गावरील ये जा करणाऱ्या प्रवासी नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
तिसऱ्यांदा रस्ता बंद…
ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने लेंडी व मन्याड नदीला पूर आला तसेच बारूळच्या धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग झाल्याने बॅक वॉटर मुळे मन्याड नदीला पूर येऊन दि.18 व 29 ऑगस्ट रोजी देगलूर नांदेड रस्ता बंद करण्यात आला होता. त्यानंतर शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी पुन्हा बारूळच्या बॅक वॉटर मुळे टाकळी अटकळी रस्त्यावरून पाणी जात असल्याने नायगाव-देगलूर रस्ता वाहतुकीसाठी तिसऱ्यांदा बंद करण्यात आला आहे.



