ताज्या बातम्यानांदेडनायगांव

विमा कंपनीची मनमानी; हजारो शेतकरी पिक विम्याच्या दाव्यातून बेदखल

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन २०२३ मधील खरीप हंगामात सोयाबीन पिकाचा विमा संरक्षित केलेल्या शेतकऱ्यांना यूनायटेड इंडिया इन्सूरन्स कंपनीने अक्षरशः ठेंगा दाखवला आहे. सप्टेबंर, ऑक्टोबर महिन्यात सलगपणे झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यापाठोपाठ जास्त काळ पाणी शेतात साचून राहून पीक संपूर्णतः पिवळे पडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रारी करताना पाणी साचून रोगराईने पीक हानी झाल्याचे नमूद केले होते.

त्यानंतर विमा कंपनीने तक्रारधारक शेतकऱ्यांच्या शेतावर न येता कार्यालयातून अशा तक्रारीचे विमा दावे बाद केले आहेत.या अन्यायकारक निर्णयामुळे हजारो शेतकरी पिक विम्याच्या नूकसान भरपाईपासून वंचित राहीले आहेत.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन २०२३ खरीप हंगामात नायगाव तालुक्यातील गडगा, टाकळी त.मा., मांजरम, रातोळी, नावंदी, आलूवडगाव, केदारवडगाव, टेंभुर्णी, कोकलेगाव, सालेगाव, कुंटूर, आदी गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, मुग, उडीद, पिकाचा विमा संरक्षित केला होता. सोयाबीन काढणीच्या अवस्थेत येत असतानाच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सलगपणे तीन-चार वेळा अतिवृष्टी झाली त्यामुळे सोयाबीन पिकात जास्त दिवस पाणी साचून राहीले.

पीक पिवळे पडून सडले. शेतकऱ्यांनी पीक नूकसानीची माहिती विमा कंपनी, कृषी विभागाकडे ७२ तासाच्या आत केल्या आहेत. त्यानंतर विमा कंपनीने नूकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे (कार्यवाही) करणे अनिवार्य असताना देखील तसे काहीच झाले नाही. त्याउलट अशा शेतकऱ्यांचे विमा दावे बाद करण्याचा प्रताप कंपनीने केला आहे.

जिल्हाप्रशासनाने अशा शेतकऱ्यांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्ज ३ सप्टेंबर पर्यंत तालुका कृषी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानूसार शेतकरी मोठ्या संख्येने नायगाव येथील कृषी कार्यालयात गर्दी करीत आहेत. याठिकाणी एकच विमा प्रतिनिधी तक्रार अर्ज स्विकारण्यास ठेवण्यात आल्याने शुक्रवारी ३सप्टेंबर रोजी येथे शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या.

आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. कंपनीचे दोन जण असल्याने अडचणी येत आहेत. शिक्कासह पोहच पावतीची आवश्यकता नाही.रजीस्टरमध्ये नोंद घेतली जात आहे. एस.डी.वरपडे, तालुका कृषी अधिकारी नायगाव.

सकाळपासून रांगेत उभे राहून दुपारी तीन वाजता नंबर लागला.तक्रार अर्ज घेण्यात आला पण त्या साहेबांनी पोहोच पावती वर शिक्का दिला नाही.उद्या सही माझी नाही म्हटले तर शेतकऱ्यांनी काय करावे? गणपती ढगे, मंगेश बेंद्रीकर, उत्तम ढगे, शिवाजी शिंदे, कमलबाई ढगे शेतकरी वजीरगाव, मांजरम, बेंद्री ता.नायगाव.

एक्सेस रेन असा पर्याय देवून तक्रार दाखल करण्यात आलेले दावे मंजूर करण्यात आले आहेत.डिसीज तक्रारी रिजेक्ट करण्याची कार्यवाही वरूनच आहे.तरीही डॉकेट आयडी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज सादर करू शकतील. विशाल भद्रे, विमा प्रतिनिधी नायगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker