नायगाव तालुक्यात पहील्याच दिवशी शंभर टक्के पुस्तके वाटप : विविध अधिकाऱ्यांच्या ५३ शाळांना भेटी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : शिक्षण विभागाने योग्य नियोजन करुन वेळेच्या आता शाळापर्यत पाठपुस्तके पोहचविल्याने पहील्याच दिवशी शंभर टक्के पुस्तकाचे वाटप करण्यात आले आहे. तर शंभर शाळांना भेटी या नायगाव उपक्रमांतर्गत तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ५३ शाळांना भेटी दिल्या. त्याचबरोबर पहील्यांदा प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांच जोरदार स्वागत करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील यांनी दिली आहे.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जून महिन्याच्या १६ तारखेपासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले. शाळा उघडण्याच्या पहिल्या दिवशी विध्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधाचे मूल्यमापन करण्यासाठी शासनाने १०० शाळांना भेट हा उपक्रम राबविण्याचा आदेश काढला असून त्यानुसार नायगाव तालुक्यातील एकूण १०६ शाळेपैकी ५३ शाळांना नायगावच्या तहसीलदार धम्मप्रीया गायकवाड, गटविकास अधिकारी संजय मिरजकर, नायब तहसीलदार विजय येरावाड, नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
शंभर शाळांना भेट उपक्रमाअंतर्गत शाळा भेट, शैक्षणिक गुणवत्ता व सोयी सुविधाचा आढावा घेवून विध्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शाळांच्या पायाभूत सुविधाच निराकरण करणे, विद्यार्थ्यांना विविध शासकिय अधिका-यांचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा उपक्रम शासन राबवित आहे.
शाळेच्या पहील्याच दिवशी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांबरोबरच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले असून. तालुक्यातील अनेक शाळात वह्या, पुस्तके, पेना, चाँकलेट, बिस्किटे आणि पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर काही शाळामध्ये पहील्याच दिवशी शाळेत आल्याच्या आठवणी रहाव्यात यासाठी सेल्फी पाँईट करण्यात आले होते.
शाळा सुरु होण्याच्या अगोदर पहील्या वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात १६३० प्रवेशपात्र मुले होती. यापैकी पहील्याच दिवशी १३४४ मुलांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पहील्या वर्गात ८२ टक्के प्रवेश झाले आहेत. तालुक्यातील १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहील्याच दिवशी पाठपुस्तके मिळाली पाहीजेत यासाठी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने अगोदरच नियोजन करुन शाळा सुरु होण्याच्या अगोदरच पुस्तके संबधीत शाळेत पोहचवली होती. त्यामुळे शाळांना भेटी दिलेल्या अधिकाऱ्यांच्या हस्ते पहील्याच दिवशी पाठपुस्तके वाटप करण्यात आली आहेत.