अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी यासाठी : नरसीत धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाने नरसी येथे रास्तारोको आंदोलन केले. नायगाव बंद आणि रास्तारोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवतांना पोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली.

एकीकडे मराठा समाजाने बंद पुकारलेला असताना दुसरीकडे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी व्हावी म्हणून मागील १५ दिवसापासून पंढरपूर येथे धनगर समाज बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामधील अनेक उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. हि सर्व मंडळी धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाची बाजी लावून लढत आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एसटी आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे.
पंढरपूर येथे बसलेल्या उपोषणकर्त्यांना नैतिक पाठबळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारी (ता.२३) रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नरसी चौकात सकल धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
सकल धनगर समाजाच्या आंदोलनात माणिकराव लोहगावे, सुर्याजी चाडकर धनगर समाज युवा मल्हार सेनाचे सरचिटणीस महा. राज्य बालाजी नारे, संजय चोंडे, माधव चिंतले, साहेबराव चट्टे, प्रभू कौऊटकर, दत्ता शिंगणे, हनुमंतराव पाटील वन्नाळे, मारुती खांदाजे, सालेगांवचे सरपंच बालाजी लव्हाळे, दिगाबंर जुंबाडे, मोहन महादाळे, संदीप लव्हाळे, तसेच असंख्य धनगर समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
रास्ता रोको आंदोलनांचा इशारा दिल्यानंतर ही रस्तावर महामंडळाच्या बसेस सकाळी सोडण्यात आल्या. मात्र पोलीसांनी तात्काळ सुचना दिल्यानंतर सकाळी नऊ नंतर सर्व बसेस येथील बसस्थानक परिसरात लावण्यात आल्या. बसेसची संख्या जास्त असल्याने रामतीर्थ पोलीसांनी पोलिस बंदोबस्तात ३० बसेस बिलोली देगलूर आणि मुखेड बसस्थानकांच्या डेपोमध्ये पाठवून दिल्या. सोमवारी सकाळी १० नंतर एकही बस रस्त्यावर धावली नाही. आचानक बसेस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.