आ.राजेश पवार यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ नरसी येथे रस्तारोको

मोरे मनोहर
किनाळा :- नायगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश पवार यांनी नरसी येथील चौकात अण्णाभाऊ साठे ऐवजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवला पाहिजे या मताचा मी आहे असे म्हणून बौद्ध आणि मातंग या दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या वक्तव्याच्या जाहीर निषेधार्थ दि.15 ऑक्टोंबर रोजी नरसी येथील व्यापार पेठ बंद ठेवून रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदन सकल मातंग व बौद्ध समाजाचे कार्यकर्ते माधवदादा जमदाडे, माधवदादा वाघमारे,अनिल शिरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत 13 ऑक्टोंबर रोजी रामतीर्थ पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की नायगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश पवार हे दि. 11 ऑक्टोंबर रोजी नरसी येथे विविध विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की नरसी येथील चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ऐवजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवला पाहिजे या मताचा मी आहे असे मनाले असल्याने बौद्ध आणि मातंग बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे म्हणून सकल मातंग व बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आमदार राजेश पवार यांनी बौद्ध आणि मातंग समाजात तेढ निर्माण करून दंगली पेटवण्याचा प्रयत्न करणे, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केले या प्रकरणी आमदार राजेश पवार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी 15 ऑक्टोंबर रोजी नरसी बाजारपेठ बंद ठेवून जाहीर निषेध करण्यासाठी येथील राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन रामतीर्थ पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनावर सकल मातंग व बौद्ध समाजाचे कार्यकर्ते माधवदादा जमदाडे, माधवदादा वाघमारे, राहुल जिगळेकर, अनिल शिरसे, गौतम गावंडे, भारत भालेराव, देविदास सूर्यवंशी, साईनाथ कांबळे, गंगाधर कोतेवार, सचिन भेदे,बबलु नरसीकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.