कुंडलवाडी शहरातील मुख्य रस्त्यावरील भुसार दुकान चोरट्यांनी फोडले
◆ कुंडलवाडी पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान

कुंडलवाडी :- शहरातील मुख्य बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर असलेले मैनोद्दीन मगदूम साब शेख यांचे भुसार दुकानावरील पत्रे वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील गल्यातील रोख रक्कम लंपास करून महत्त्वाची कागदपत्रे, भुसार मालाचे मोठे नुकसान केल्याची घटना दि.१९ ऑक्टोबर च्या मध्यरात्री घडली आहे. भुसार दुकानाचे मालक मैनोद्दीन शेख हे दुकान उघडण्यासाठी आले असता दि.२० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे.कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेतील भुसार दुकान चोरट्यांनी फोडल्याने कुंडलवाडी पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर गत ४० वर्षापासून मैनोद्दीन मगदूम साब यांचे भुसार दुकान आहे.दररोजचे व्यवहार करून शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दुकान बंद करून ते घराकडे गेले.दि.१९ ऑक्टोबर रोजी ग्रामीण बँकेतून नगदी तीन लाख रुपये आणून भुसार दुकानातील गल्ल्यांमध्ये ठेवून गेले होते.
तसेच दुकानात महत्त्वाची कागदपत्रे व सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी आदी भुसार माल होता. दिनांक १९ ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे वरचे पत्रे वाकून दुकानात प्रवेश करून दुकानात गल्ल्यात ठेवलेले ३ लाख रुपये, महत्त्वाची कागदपत्रे तसेच सोयाबीन मूग उडीद,ज्वारी आदी भुसार मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच दुकानातील खुर्च्यांचीही तोडफोड चोरट्यांनी केली आहे. अशी माहिती दुकानाचे मालक मैनोद्दीन शेख यांनी दिली आहे.
घटनेची माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांना मिळताच त्यांनी दि.२० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता घटनास्थळी भेट देत पाहणी केली व परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करून तपास करण्यात येऊन चोरट्यांनी पकडण्यात येणार असल्याचे सांगितले. बातमी लिहीपर्यंत कुंडलवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली नव्हती.
शहरातील मुख्य रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेतील भुसार दुकान फोडल्याने कुंडलवाडी पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.कुंडलवाडी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.